![]()
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र विविध विषयांवर देखावे साकारले जात असताना, अकोल्यात गीत परळीकर हिने आपल्या कल्पकतेतून साकारलेली आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
.
गणरायाच्या आरासीतून तिने थेट गावच्या मातीचा सुगंध आणि तेथील साध्या, कष्टकरी जीवनाचा अनुभव भाविकांना घडवून दिला आहे. शेताच्या हिरव्यागार बांधापासून ते पारंपरिक कौलारू घरांपर्यंत ग्रामीण जीवनाचा प्रत्येक बारीक पैलू तिने या देखाव्यात अत्यंत जिवंतपणे मांडला आहे.या आरासीत बैलगाडी, बैल, पाण्याची विहीर, शेतीची पारंपरिक अवजारे आणि डोलणारी पिके यांची सुरेख मांडणी डोळ्यांचे पारणे फेडते. गावातला साधेपणा, अविरत श्रम, लोकसंस्कृती, पूर्वापार चालत आलेल्या परंपरा या सजावटीतून प्रभावीपणे उमटताना दिसतात. मातीशी घट्ट नाते सांगणाऱ्या या देखाव्यात केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष व वास्तवही तितक्याच समर्पकपणे मांडण्यात आले आहे. पहाटेच्या चुलीचा धूर, शेतातील प्रसन्न हिरवळ, घरासमोरील अंगणात रेखाटलेल्या रांगोळीची आठवण करून देणारी ही सजावट मूळ गावाकडे घेऊन जाते. गणरायाच्या सान्निध्यात कृषी संस्कृतीचे हे विहंगम दृश्य उभारून तिने कलागुणांची झलक दाखवली आहे.
देखाव्यातून दिला मातीशी नाळ जोडणारा संदेश केवळ दिखाऊ रोषणाईला फाटा देत समाजाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या कष्टाला या आरासीतून मानाचा मुजरा करण्यात आला आहे. अंगणातील रांगोळी, गावच्या निसर्गाची आठवण करून देणारा हा देखावा नव्या पिढीला ग्रामीण संस्कृतीशी जोडणारा ठरतो आहे.