![]()
राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन, आगामी गणेशोत्सव आणि राज्यावर ओढावलेले दुष्काळाचे गंभीर संकट या सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत आंदोलन केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणीही आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच, राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके करपत असून, दुष्काळ निवारणासाठी सरकार वेगाने पावले उचलत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘शिंदे-फडणवीसांवरील टीका अयोग्य’ मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “ओबीसी असो वा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या इतिहासात मराठा समाजाला एवढा न्याय यापूर्वी कधीच मिळाला नव्हता, जेवढा या दोन नेत्यांनी दिला आहे. असे असताना या दोन्ही नेत्यांवर ज्या पद्धतीने वैयक्तिक टीका केली जाते, ती महाराष्ट्राला आणि समाजाला पटणारी नाही.” सरकार सकारात्मक पद्धतीने काम करत असून, त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, देशाचा सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवात कोणीही आंदोलने करून विघ्न आणू नये, असेही ते म्हणाले. दुष्काळप्रश्नी सरकार अलर्ट मोडवर राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी चिंतेचा सूर व्यक्त केला. “सध्या राज्याच्या १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून पिके करपत आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून कसे बाहेर काढता येईल आणि ते आत्महत्येकडे वळणार नाहीत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहे. मुख्य सचिवांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर NDRF आणि SDRF च्या निकषांनुसार मदत जाहीर केली जाईल. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या परिस्थितीचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना फी माफी, कर्ज वसुली थांबवणे यासारखे दिलासादायक निर्णय घेतले जातील, असे संकेत बावनकुळे यांनी दिले. ‘ओयो’ हॉटेल्सवर पोलिसांची करडी नजर नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी ‘ओयो’ (OYO) हॉटेल्सच्या संदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांना कडक निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ————- हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस: आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
गणेशोत्सवात कुणीही आंदोलन करू नये:सरकार सकारात्मक आहे, थोडा वेळ दिला पाहिजे; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन