![]()
जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांना कृषी कर्ज वितरणाचा लाभ मिळावा, असे निर्देश खा. अनुप धोत्रे यांनी कृषी कर्ज मेळाव्यात दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “देशव्यापी मेगा कृषी कर्ज पोहोच कार्यक्रम” पार पडला. “बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत- शेतकरी समृद्धी, बँक प्रगती” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या विशेष मेळाव्यात शेकडो शेतकरी, कृषी उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले होते. कार्यक्रमात क्षेत्रीय प्रमुख पंकज कुमार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या प्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे डीजीएम दिलीप बरनवाल, नयन सिन्हा यांनी पत धोरणांविषयी मार्गदर्शन केले. विविध बँकिंग योजनांचे सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात शेतकऱ्यांना, उद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, अकोला डाळ मिल असोसिएशनचे शांतीलाल भाला यांनी अकोल्यातील स्थानिक उद्योग, शेती यांच्यातील साखळीवर मत व्यक्त केले. मेळाव्यात कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन निलेश मुंधेकर यांनी केले. विविध महत्त्वाच्या कर्ज योजना, पीक कर्ज, कृषी पूरक व्यवसायांसाठी मिळणाऱ्या अनुदानांविषयी सरफराज आलम यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे यांनी कृषी योजना, बँकिंग क्षेत्राच्या समन्वयावर भर दिला. कृषी विज्ञान केंद्राचे संचालक उमेश ठाकरे यांनी “बियाण्यांपासून ते थेट बाजारापर्यंत” आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. असा आहे कर्ज तपशील ३१ मे अखेर एकूण ६४८ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. निश्चित करण्यात आलेल्या १३२० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे वितरण ४९.११ टक्के इतके आहे. खरीप हंगामासाठी १ लाख ३९ हजार ४५० शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणाचे लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून नव्या हंगामासाठी कर्जवाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ५४ हजार ७८४ शेतकरी खातेदारांना प्रत्यक्ष पीककर्जाचा लाभ मिळालेला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे. बँकेने ४६८.९५ कोटी रुपये वितरीत करत उद्दिष्टाच्या सुमारे ७५ टक्के कामगिरी नोंदवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून ८ हजार ७९९ शेतकऱ्यांना ११३ कोटी ३८ लाखाचे कर्ज वितरीत केले.
Source link
गरजू शेतकऱ्याला कृषी कर्ज मिळावे- खा. धोत्रे:शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, कर्ज मंजुरी पत्रांचे करण्यात आले वितरण