![]()
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अटी आणि शर्ती लादल्या असून, त्यांना थेट महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या अटी काय आहेत? या प्रकरणात जोपर्यंत पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात नाही, तोपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहावे लागेल. ते राज्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करतील, तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांना आठवड्यातून ३ वेळा हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. साक्षीदारांशी संपर्क नाही खटला पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पीडित डॉक्टर किंवा साक्षीदाराशी संपर्क साधण्यास त्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय होते? ६ जुलै रोजी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बाळाला एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी नातेवाईकांना योग्य उपचारासाठी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. याचा राग मनात धरून नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावून घेतले. रुग्णालयात पोहोचताच म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टरसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती, ज्यानंतर त्यांना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. सुओ मोटो कारवाईनंतर आता जामीन या प्रकरणी सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयाने म्हात्रे यांना जामीन दिला होता, मात्र या गंभीर घटनेची उच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घेत तो जामीन तात्काळ रद्द केला होता आणि त्यांना पुन्हा कोठडीत धाडले होते. आता या प्रकरणात न्यायालयाने अखेर त्यांना जामीन मंजूर केला असून त्यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्यांना थेट राज्याबाहेर राहावे लागणार असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेही वाचा.. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा सरकारचा कट!:नेत्यांची पोरं परदेशात, कार्यकर्त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय; पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीलाच जरांगेंचा घणाघात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंतरवाली सराटी येथून आपल्या ‘पश्चिम महाराष्ट्र’ दौऱ्याला सुरुवात केली आहे. हा दौरा १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यादरम्यान ते विविध जिल्ह्यांत जाऊन समाजाशी संवाद साधणार आहेत. मात्र, दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वीच माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर आणि सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सविस्तर वाचा
Source link
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण:रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर, पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश