.

सुख-दुःखात सोबत राहू आणि मृत्यूच्या दारातही साथ निभावू, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली आहे. सुसुंद्रे कुटुंबातील वृद्ध पती-पत्नीचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिगाव येथील रहिवासी हरी सांडू सुसुंद्रे (८०) यांचे गुरुवारी (९ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. पतीच्या निधनाचा धक्का ६५ वर्षीय पत्नी भागाबाई सुसुंद्रे यांना सहन झाला नाही. पतिविरहाच्या दुःखात बुडालेल्या भागाबाईंचेही अवघ्या चार तासांनंतर म्हणजेच शुक्रवारी (१० जुलै) पहाटे २ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हरी सुसुंद्रे हे गेल्या काही काळापासून आजारी होते. या संपूर्ण कठीण काळात त्यांची पत्नी भागाबाई यांनी सावलीसारखी त्यांची साथ दिली. औषधोपचारापासून ते अहोरात्र सेवा करण्यापर्यंत भागाबाईंनी पतीची काळजी घेतली. मात्र, गुरुवारी रात्री नियतीने हरी यांची साथ हिरावून घेतली. दोघांवरही दिगाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार आयुष्यभर एकमेकांना सुख-दुःखात साथ देणाऱ्या या दांपत्याचा अंतिम प्रवासही सोबतच झाला. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दिगाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात या दांपत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.