![]()
जायकवाडी धरणातील जलसाठा ९४.४५ टक्क्यांवर पोहोचला असून, शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या सोहळ्यास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, तहसीलदार ज्योती पवार, मनोरमा गायकवाड, भुषण कावसानकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या मुबलक जलसाठ्यामुळे आगामी रब्बी हंगाम, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. परंतु, उपलब्ध पाण्याचे आगामी काळात काटेकोर व नियोजनबद्ध वाटप होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. तर आमदार विलास भुमरे यांनी, यंदाचा साठा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मोठा आधार ठरेल, असे सांगितले. पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला असून पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे. यावेळी अभियंता तुषार विसपुते, सतीश अंधाळे, नगरसेवक बजरंग लिंबोरे, फाजलभाई टेकडी, राजुभाऊ गायकवाड,अनिकेत धारकर, नामदेव खरात उपस्थित होते. शनिवारी रात्री ८ वाजता धरणाच्या मुख्य २७ पैकी ८ दरवाज्यांतून यापूर्वी सुरू असलेला ४ हजार क्युसेकचा विसर्ग वाढवून तो आता ९ हजार ८१० क्युसेकवर नेण्यात आला. पाणीपातळी १५२०.९९ फुटांवर पोहोचली असून धरण ९४.४५ टक्के भरले आहे.
Source link
धरणाच्या पाण्याचे नियोजन गरजेचे:पैठण येथील जायकवाडी धरण 94.45% पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन