![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय येथे नसून तब्बल २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनेरा येथे सुरू आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये नांदगाव खंडेश्वर येथे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बडनेरा येथे का ठेवण्यात आले, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. तोच त्यांच्या संतापाचा विषय बनला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. अमरावती येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय असल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी न ठेवता ते बडनेरा येथे ठेवण्याचे नेमके औचित्य काय? असा प्रश्नही त्यानिमित्ताने विचारला जात आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा आवाका फार मोठा आहे. या तालुक्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना २८ किमी दूर असलेल्या बडनेऱ्याला वारंवार फेऱ्या घालाव्या लागतात. त्यातही कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी भेटतीलच, याची शाश्वती नसते. अधिकारी उपलब्ध नसल्यास नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रवास करावा लागतो. त्यामुळे एक काम करण्यासाठी नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. कार्यालय दूरवर असल्यामुळे नागरिकांच्या वेळेचा, पैशांचा, श्रमांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे हे कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी आहे की अधिकारी-कर्मचाऱ्यांच ्या सोयीसाठी? हा सवालही आता नांदगावकर विचारत आहेत. मुळात हा आरोप खरा की खोटा, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दुसरीकडे विभागातील लोकप्रतिनिधी हा प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे का मांडत नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. २७ वर्षांपासून पाठपुरावा, शासनाकडे मागणी पडून सदर कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे सुरू करण्यात यावे, यासाठी सन १९९९ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तब्बल २७ वर्षे उलटूनही या मागणीवर ठोस निर्णय झालेला नाही. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत अनेक अधिकारी आले. अनेक गेले. अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले. मात्र नांदगावकरांचा हा मूलभूत प्रश्न आजही जैसे थेच आहे.
Source link
नांदगावसाठीचे सार्वजनिक बांधकाम कार्यालय तब्बल 28 कि.मी. अंतरावर:कार्यालयात अधिकारी भेटतीलच याची शाश्वती नाही