.

आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना घरच्या जेवणाचा आस्वाद मिळावा या उदात्त भावनेतून नांदेड येथील रहिवासी भारत रामीतवार व त्यांचे जावई पंकज पोकलवार यांचे कुटुंब गेली तब्बल १५ वर्षे अखंडपणे अन्नदानाची सेवा बजावत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नातेपुते येथे दि. १९ जुलै रोजी पहिला मुक्काम असल्याने येथे सलग तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या सेवेद्वारे एक ते सव्वा लाखांहून अधिक वारकरी भाविकांना भाकरी, पिठलं, ठेचा आणि कांदा असा घरगुती व पौष्टिक प्रसाद दिला जातो. या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना प्रवासात घरच्या जेवणाचा आनंद मिळत असून, सेवाभावाचा आदर्श समाजासमोर उभा राहत आहे.
भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर मिलाफ घडवणारे भारत रामीतवार, पंकज पोकलवार आणि त्यांचे कुटुंब गेली दीड दशक अखंडपणे ही सेवा करत असून, त्यांचा हा उपक्रम वारी परंपरेतील निस्वार्थ सेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि “माऊली”च्या नामघोषात मिळणारा आनंद हाच या सेवाकार्यातील सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना या सेवकांनी व्यक्त केली. या अन्नदानातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भाकरी तयार करण्याचे काम. यासाठी सुमारे ६०० महिला सलग तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन हजारो भाकऱ्या तयार करतात. त्यांच्या श्रमातूनच वारकऱ्यांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाने भरलेला महाप्रसाद पोहोचतो. महाप्रसादाच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा वापर केला जातो. यामध्ये १०० क्विंटल ज्वारी, १०० क्विंटल बेसन, १५ क्विंटल मिरची, १५ क्विंटल कांदा, १० क्विंटल टोमॅटो तसेच विविध मसाले आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश असतो. हजारो वारकऱ्यांसाठी दर्जेदार व स्वादिष्ट भोजन तयार करण्यासाठी अनेक स्वयंसेवक दिवस-रात्र परिश्रम घेत असतात.
महाप्रसादासाठी १०० क्विंटल ज्वारी अन् बेसनाचा वापर