![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ हा देशाला अत्यंत चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा काळ म्हणून नोंदवला जाईल. त्यांच्या कार्यकाळात देशात कोणताही वास्तविक विकास झाला नाही, उलट देशावरील कर्ज वाढले आणि देश मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर निशाणा साधताना त्यांनी, पंतप्रधानांनी आपल्या चुका सुधाराव्यात आणि देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी, हीच या 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहे, असा खोचक टोलाही लगावला. तसेच, “या पनौतीचे राज्य जाऊन देशात बळीराजाचे राज्य यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठी आश्वासने दिली होती, परंतु त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. तरुणांना रोजगार मिळाला नाही, नागरिकांच्या खात्यात पैसे आले नाहीत, स्मार्ट सिटी झाल्या नाहीत आणि शेतकऱ्यांचाही कोणताही फायदा झाला नाही. उलट देशात दहशतवाद वाढला असून, आपण कोणाकडून काय खरेदी करावे हेसुद्धा आपण ठरवू शकत नाही, हे पंतप्रधान मोदींचे मोठे अपयश आहे. जिंकणाऱ्या सैन्याला अमेरिका माघार घ्यायला लावते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’चा सिंह आज भंगारात गेला असून, युवकांना नोकऱ्या नसल्याने सर्व गोष्टी परदेशातून मागवाव्या लागत आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांनी उच्चांक गाठला असून सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. व्यवस्था कोलमडली; महामार्गांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशात सध्या कोणतीही शासकीय व्यवस्था उरलेली नाही. ‘नीट’ परीक्षेचे पेपर आज हवेतून आणावे लागत आहेत, इतकी दुरवस्था झाली आहे. इंधन टंचाईच्या काळात केवळ खाजगी कंपन्या आणि ठराविक उद्योगपतींनीच अफाट पैसा कमावला असून, हे सरकार फक्त काही मोजक्या उद्योजकांसाठीच चालवले जात आहे. याशिवाय, ‘समृद्धी महामार्गा’च्या कामात तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, आता आगामी ‘शक्तीपीठ महामार्गा’मध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. स्वातंत्र्यलढ्याशी द्रोह करणारे आज सत्तेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जे लोक स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या सोबत होते, तीच मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत बसली आहेत. 1952 च्या पहिल्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रनिर्माणासाठी मोठे योगदान दिले, म्हणूनच त्यांची ओळख ‘फाउंडर ऑफ नेशन’ अशी आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी दुष्काळाच्या काळात ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत देशासाठी मोठे काम केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भाजपचे लोकही ‘दुर्गा’ म्हणून संबोधत असत; त्यांनी देशाला एकसंध ठेवले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून इतिहास घडवला, हे योगदान देश कधीही विसरणार नाही. दुर्दैवाने, या देशात सर्वप्रथम महात्मा गांधींची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि नंतर इंदिराजींचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. माजी पंतप्रधानांचे योगदान मोठे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचून देशाला 21 व्या शतकात आणले, तर अटलबिहारी वाजपेयी हे अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत पंतप्रधान होते, ज्यांनी देशासाठी उत्तम काम केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आज देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. अशा प्रकारे आजवरच्या अनेक पंतप्रधानांचे देशासाठी ऐतिहासिक योगदान राहिले आहे. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाची पीछेहाटच झाली असून, त्यांना आता आपण नेमके काय संबोधावे, असा यक्षप्रश्न आज भारतातील प्रत्येक सुजाण नागरिकाला पडला आहे, असे स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
Source link
पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ देशाला मागे नेणारा:'पनौती'चे राज्य जाऊन बळीराजाचे राज्य यावे- हर्षवर्धन सपकाळ