Headlines

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण:तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकालाची शक्यता; खासदार निंबाळकर मुंबई सत्र न्यायालयात हजर




राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर आज अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात आज सकाळी 11 वाजता या संवेदनशील खटल्याची सुनावणी होणार असून, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या सुनावणीसाठी पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत दाखल झाले आहेत. यासोबतच, याच घटनेत मृत्युमुखी पडलेले पवनराजे यांचे चालक समद काझी यांचे कुटुंबही न्यायालयात उपस्थित राहणार आहे. 14 मे रोजी झालेल्या मागील सुनावणी दरम्यान मुख्य आरोपी डॉ. पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी वैद्यकीय कारणास्तव मुदत मागितली होती, ज्यामुळे हा निकाल पुढे ढकलला गेला होता. राजकीय वैराच्या पार्श्वभूमीवर 3 जून 2006 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. मुंबईहून धाराशिवला जात असताना, नवी मुंबईतील कळंबोली येथे दोन अज्ञात हल्लेखोरांनी पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. सीबीआयच्या तपासांनुसार, हा खून राजकीय वैमनस्यातून 25 लाखांची सुपारी देऊन घडवून आणण्यात आला होता. या खटल्यामध्ये राज्याचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असून, त्यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशातील बसपा नेते कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन अशा एकूण 9 आरोपींचा समावेश आहे. डॉ. पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर 2009 पासून जामिनावर बाहेर आहेत. धाराशिवमध्ये पोलिस यंत्रणा हायअलर्टवर दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा हायअलर्टवर आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर कुटुंब यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असून, सोशल मीडियावरील कोणत्याही अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टवर कडक कारवाई करण्यासाठी सायबर पोलीस सज्ज झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *