![]()
मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा प्रादेशिक जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक प्रकार विधान परिषदेत चर्चेस आला. या केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडून एका बैलाचा मृत्यू झाला. मात्र, ५ दिवस हा मृत बैल टाकीतच सडत होता आणि याच टाकीतील पाणी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ५१ गावांतील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले गेले. या गंभीर हलगर्जीपणावरून एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. चौकशी सुरू : बोर्डीकर या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, “या घटनेची चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल.” मात्र, या गोलमाल उत्तराने खडसे अधिकच संतप्त झाले. त्यांनी थेट मंत्र्यांनाच खडा सवाल केला, “तुम्हाला पाच दिवस बैल सडलेले तेच पाणी प्यायला दिले तर चालेल का?” या थेट प्रश्नानंतर सभागृहात काही काळ प्रचंड गदारोळ झाला. अधिकाऱ्यांवर कारवाई करा हा प्रकार म्हणजे हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याचा घणाघात खडसे यांनी केला. “ही साधी चूक नाही, तर निष्काळजीपणाचा कळस आहे. ५ दिवस सडलेल्या बैलाचे पाणी हजारो नागरिकांच्या घशाखाली उतरले. त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही? त्यांना सभागृहात निलंबित करणार का? असा सवालही त्यांनी या वेळी बोलताना केला.
Source link
पाण्याच्या टाकीत 5 दिवस मृत बैल सडत होता,:तेच पाणी 51 गावांना पुरवले- खडसे, मुक्ताईनगरच्या सारोळ्यातील प्रकार विधान परिषदेत