Headlines

पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागात ‘भीमशक्ती’ कार्यकर्त्यांचा ठिय्या:14 लाखांची योजनेची हाेणार चाैकशी, दहीहंडा परिसरात टंचाई‎




दहीहंडा येथील पाण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट विकासकामे, दलित वस्ती निधीचा दुरुपयोग आदींबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. अखेर कार्यकारी अभियंत्याने संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दहीहंडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या विशेष टंचाईग्रस्त गाव योजनेतून पूर्णा नदी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तब्बल १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या योजनेतून गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, निकृष्ट दर्जाची पाइपलाइन, बोरवेल, अपूर्ण कामांमुळे पाणी गावात न पोहोचता थेट नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, चौकशीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मधुसूदन भटकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विविध विकासकामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १४ लाख रुपयांच्या विशेष पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च होऊनही गावात पाणी पोहोचले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदन देताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मधुसूदन भटकर, प्रा. डॉ. विजय आठवले, विद्याधर मोहोड, अनिल तायडे, महेंद्र मोहोड, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, संदेश गवई, किशोर शिरसाट, रमेश सावळे, शंकर वानखडे, सचिन खांडेकर, संदीप वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कामांचीही चौकशी करा दलित वस्ती निधी, स्थानिक विकास निधी, इतर विकासकामांचे तांत्रिक लेखापरीक्षण, सामाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. कथित आर्थिक गैरव्यवहारांची निष्पक्ष, उच्चस्तरीय चौकशी तातडीने सुरू करण्यात यावी. अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने दिला ठिय्या अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जवळपास एक तास अभियंत्यांच्या दालनात ठिय्या देत चौकशीबाबत स्पष्ट आदेश मिळाल्याशिवाय कार्यालयातून न उठण्याची भूमिका घेतली. अखेर कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *