Headlines

बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये:हिंगोलीत तरुणाने दिली चुकीची माहिती; खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल




गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असून तातडीने यावे असा संदेश मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हातचे काम सोडून जामठी बुद्रूक (ता.हिंगोली) गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी सर्वत्र शांतता दिसून आली अन कुठलाही विवाह नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या प्रकरणात डायल 112 वर चुकीची माहिती देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी मंगळवारी ता. 21 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात अक्षय्य तृतीय व इतर वेळी बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच नव्हे तर इतर वेळीही सतर्क रहावे व आवश्‍यक त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21रात्री पावने नऊ वाजण्याच्या सुमारास डायल 112 क्रमांकवर महादेव आठवले (रा. जामठी बुद्रूक) या तरुणाने संपर्क साधून गावात 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असून तुम्ही लवकर या, तुम्हा तातडीने कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीच दिली. गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार राजकुमार जमधाडे, सुधीर तपासे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने जामठी बुद्रूक गावात जाऊन पाहणी केली. पोलिसांनी संपूर्ण गावात फेरफटका मारला. मात्र कुठेही विवाह होत असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी गावातील पोलिस पाटील व इतरांशी संवाद साधून खात्री केली. त्यांनीही गावात विवाह नसल्याची माहिती दिली. डायल 112 वर मिळालेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या प्रकरणी जमादार तपासे यांच्या तक्रारीवरून महादेव आठवले याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार जमधाडे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *