Headlines

बेंदूरच्या दिवशीच जनावर चोरांच्या मुसक्या आवळल्या:भुईंज पोलिसांची कारवाई, पिकअपमधून जनावरे चोरणारी टोळी जेरबंद




भुईंज, कुडाळ, बावधन परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर डल्ला मारत पिकअप वाहनातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (रा. पाचवड), संदेश हणमंत पिसाळ (रा. व्याजवाडी) आणि हर्षद हिंदुराव चव्हाण (रा. कडेगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी वाई तालुक्यातील विविध गावांमधून म्हशी व जर्सी गाय चोरी करून त्या पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली आहे. कवठे (ता. वाई) येथील किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून १९ जूनच्या रात्री ते २० जूनच्या सकाळदरम्यान दोन मुऱ्हा जातीच्या म्हशी चोरीला गेल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. आरोपी पिकअप वाहनातून पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाचवड चौकात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी कवठे येथील दोन म्हशी, ओझर्डे येथील एक म्हैस, खडकी येथील एक जर्सी गाय आणि कुडाळ येथील दोन म्हशी चोरी करून त्या चाकण (जि. पुणे), काष्टी-श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) आणि सांगोला (जि. सोलापूर) येथील गुरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त केली असून आरोपींना अटक करून पोलिस कोठडी मिळविण्यात आली आहे. चोरीस गेलेली जनावरे ज्या व्यापाऱ्यांकडे विकण्यात आली आहेत, त्यांचा शोध घेऊन ती परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेंदूर सणाच्या दिवशीच जनावरचोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने भुईंज, कुडाळ, बावधन आणि परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस हवालदार नितीन जाधव, पोलिस हवालदार धायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *