![]()
“भारतीय जनता पक्षाला या देशातील संविधान गुंडाळून ठेवायचे आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून हा देश चालवायचा आहे. त्यामुळेच अशा मनुवादी प्रवृत्ती आजही समाजात पाहायला मिळत आहेत,” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपची ‘तिरंगा रॅली’, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा झालेला कथित अपमान आणि आगामी काळात राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत सविस्तर भाष्य केले. मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान आणि ‘शुद्धीकरणा’वर संताप काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, “आमच्या आंदोलनाचा आणि भाजपच्या तिरंगा रॅलीचा कोणताही संबंध नाही. ज्यांच्या हातात आज तिरंगा आहे, त्यांनी आधी आपली मनुवादी प्रवृत्ती सोडली पाहिजे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे दलित समाजातून येतात. त्यांनी ज्या मैदानावर रॅली केली, त्या ठिकाणाचे नंतर जर तथाकथित स्वरूपात ‘शुद्धीकरण’ केले जात असेल, तर ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. याच प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.” संविधान गुंडाळून मनुस्मृतीने देश चालवण्याचा घाट भाजपच्या विचारधारेवर थेट निशाणा साधत ते म्हणाले, “भाजपला संविधान गुंडाळायचे आहे आणि मनुस्मृतीच्या आधारे देश चालवायचा आहे. त्याचेच हे सर्व प्रकार लक्षण आहेत. जर हे थांबले नाही, तर केवळ काँग्रेसनेच नव्हे, तर तमाम माध्यमे आणि नागरिकांनी एकत्र येऊन याविरोधात मोठा उठाव केला पाहिजे.” भाजपचे तिरंगा प्रेम म्हणजे ‘पूतना मावशीचे प्रेम’ राज्यभरात भाजपकडून काढण्यात येत असलेल्या ‘तिरंगा यात्रे’वरही सपकाळ यांनी जोरदार टीका केली. “स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आणि तत्कालीन भाजपच्या विचारधारेचा कोणताही सहभाग नव्हता. किंबहुना देशाला स्वातंत्र्य नाही मिळाले तरी चालेल, अशी त्यांची भूमिका होती. 2002 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला जात नव्हता. याबद्दल त्यांनी आधी देशाची माफी मागावी.” “आता जे लोक तिरंगा यात्रा काढत आहेत, त्यांचे राष्ट्रध्वजाबद्दलचे हे प्रेम म्हणजे निव्वळ ‘पूतना मावशीचे प्रेम’ आहे आणि देशवासीयांनी ते ओळखले आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. 22 ऑगस्टला राहुल गांधींचा पुणे दौरा आगामी काळात काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुण्यात येणार आहेत, यावरही सपकाळ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “येत्या 22 ऑगस्ट रोजी राहुल गांधी पुण्यात येत आहेत. देशभरात उघडकीस आलेला ‘नीट’ (NEET) पेपरफुटी घोटाळा आणि महाराष्ट्रातील विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे. याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इतर राज्यांमध्ये जे मुद्दे मांडले गेले, त्यापेक्षाही अधिक प्रखरपणे आणि सविस्तरपणे इथले स्थानिक व राष्ट्रीय मुद्दे या दौऱ्यात समोर येतील.” हेही वाचा.. नितेश राणेंकडून नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत: म्हणाले- आपण सगळे मूळचे हिंदूच, इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मग मुंब्र्याचे ‘मुंब्रादेवी’ का होऊ नये? महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाल्यानंतर, आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ करण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या मुद्दयावर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. रत्नागिरी येथे ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी मुंब्र्याच्या नामांतराचे संकेत दिले. तसेच, त्यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
भाजपला संविधान गुंडाळायचंय, मनुस्मृतीच्या माध्यमातून देश चालवायचाय!:हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल; 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याचीही दिली माहिती