![]()
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अमरावती येथे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा (लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण) आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात ही शपथ घेण्यात आली, ज्यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. राज्य शासनाने जलसंधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, कारण भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता या कामांना प्राधान्य देण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. यासोबतच, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण करणे आणि समाजाला साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणे हे शासनाचे प्रमुख संकल्प आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री भुसे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३०८ कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती दिली. जिल्ह्यात कमी झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ‘जलसंधारण अभियान’ राबवले जाणार आहे. आगामी २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. तसेच, काही भागांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीही मदत दिली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासासाठी पांदण रस्त्यांसाठी डीपीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सोयीचे रस्ते मिळतील. यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलिस उपअधीक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षणच्या पोलिस अधीक्षक अनिता पाटील, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलिस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदीप बद्रे, मिलींद बेलसरे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया यांचाही सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे आणि दिया पाटील या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
Source link
मंत्री दादाजी भुसे यांनी अमरावतीत दिल्या विविध शपथा:जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेसाठी नागरिकांना केले आवाहन