![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांची भाषा अत्यंत घाणेरडी असून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना शिव्या देत असल्याचा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत ‘घाणेरड्या भाषेत’ चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत आणि त्यांच्या आक्रमक भाषेबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “जालन्याच्या जिल्हाधिकारी या राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, जरांगे यांनी महिला जिल्हाधिकाऱ्यांसोबत अत्यंत घाणेरड्या भाषेत चर्चा केली.” प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अशा पद्धतीने गैरवर्तन करणे योग्य नसल्याचे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. ‘जरांगे सर्वांनाच शिव्या देत आहेत’ जरांगे यांच्या भाषेवरून तीव्र संताप व्यक्त करताना भुजबळ पुढे म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील हे आता कुणालाही सोडत नाहीत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट अशा सर्वांनाच शिव्या देत आहेत.” जरांगे यांची ही भाषा राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नसल्याचेही ते म्हणाले. ‘लोकांना त्रास होऊ नये, हे पाहणे सरकारचे काम’ मनोज जरांगे पाटील यांनी येत्या काळात थेट मुंबईत धडकण्याची आणि मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी प्रशासनालाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. “कोणत्याही आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाऊ नये. आंदोलनामुळे लोकांना कोणताही त्रास होणार नाही, हे पाहणे सरकारी यंत्रणेचे काम आहे,” असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. भुजबळांच्या या आक्रमक प्रतिक्रियेमुळे आता जरांगे आणि ओबीसी नेते यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस: आज अभिजीत दीपके घेणार जरांगेंची भेट; उद्या ठरणार मुंबई आंदोलनाची दिशा मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. दरम्यान, आज कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर आणि आंदोलनाच्या पुढील वाटचालीवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
मनोज जरांगेंची भाषा घाणेरडी, ते सर्वांनाच शिव्या देत आहेत:मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छगन भुजबळांचा संताप