Headlines

महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला:आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला- वसंत मोरे




पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार अनपेक्षितपणे आपली उमेदवारी मागे घेतली. या सर्व माघारींमुळे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मात्र या राजकीय घडामोडींवरून काँग्रेसने शरद पवार गटावर विश्वासघाताचा आरोप केला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसंत मोरे म्हणाले, महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला आहे, तिसऱ्यांदा हा विश्वासघात झाला आहे. अंकुश काकडे यांचा फॉर्म भरण्यासाठी फोन आला होता, शंभर टक्के सेटलमेंट आहे, भाऊंबदकी आहे. त्यांनी बारामतीत भाऊबंदकी करावी. ठाण्यात मदत केली, म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार, शरद पवार गटाचे शहरात तीन नगरसेवक आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, महाविकास आघाडी कायम राहील की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मी वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. शरद पवार गटामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी आतून एक आहेत, ही भाऊबंदकी आहे. याचे सर्व परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. घोडेबाजार नाही, सेटलमेंट झाली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर भाऊबंदकी करणार असाल तर महाविकास आघाडीचे वाटोळे होणार आहे, असेही मोरे यांनी म्हटले. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झालाच नाही महाविकास आघाडीमध्ये पुण्याची विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटली होती. यानुसार, पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज, तर तुषार कामठे यांनी डमी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली आणि राजकीय सूत्रे वेगाने फिरली. या नाट्यमय भेटीनंतर लगेचच श्रीकांत पाटील आणि तुषार कामठे या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शेवटपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटात धाकधूक दुसरीकडे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठी धाकधूक पाहायला मिळाली. प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतरही, अर्ज मागे घेण्याची वेळ संपत आली तरी ते निवडणूक कार्यालयात पोहोचले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रचंड धास्ती वाढली होती. अखेर, मुदत संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना प्रदीप कंद हे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत या राजकीय नाट्यावर पडदा टाकला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *