Headlines

विदुषी जया जोग यांचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा:मंगला गोडबोले म्हणाल्या- जगण्यातील मोकळ्या जागा भरण्याचा शोध महत्त्वाचा




पुणे येथे विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी ‘जगण्यातल्या आणि अनुभवांतल्या मोकळ्या जागा भरण्याचा शोध कायम राहावा,’ असे प्रतिपादन केले. कलाकाराला या शोधाचा सतत ध्यास असतो आणि जया जोग यांच्या मनातही तो कायम राहावा, अशी अपेक्षा गोडबोले यांनी व्यक्त केली. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. जया जोग यांच्या शिष्यवर्गाने या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमात जया जोग यांच्या ‘दोन देश, सात घरे – किस्से भटकंतीचे’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगला गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सतार, बासरी आणि व्हायोलीनच्या सुरेल वादनाने रंगला. ज्येष्ठ बासरीवादक पं. गिंडे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथील भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात पार पडला. गोडबोले यांनी पुढे सांगितले की, कलाकार शब्द, स्वर आणि देहाच्या माध्यमातून जी पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात, तो शोध अत्यंत महत्त्वाचा असतो. जया जोग यांनी आपल्या जीवनातील आणि अनुभवातील अशा मोकळ्या जागा शोधून त्या स्वर-शब्दांतून भरण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही त्यांनी अशा जागा टिपत राहाव्यात, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. जया जोग यांचे ‘दोन देश, सात घरे’ हे पुस्तक छोटेखानी असून, त्यात अमेरिका आणि कॅनडामधील त्यांच्या निवांत क्षणांचे अनुभव कथन केले आहे. या लेखनातून त्यांच्यातील सामाजिक भाष्यकारही दिसून येतो. डॉ. सुचेता भिडे चापेकर यांनी जया जोग यांच्या सांगीतिक प्रवासाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, संगीताचे बीज मिळाले तरी ते रुजवून त्याचे संगोपन करावे लागते आणि हे काम जया जोग यांनी उत्तम प्रकारे केले आहे. त्यांच्या सांगीतिक रचना बांधीव असूनही त्यात विस्तारक्षमता आहे, ज्यामुळे त्यांच्या रचनांचे नृत्यरूपही साकार होऊ शकते, असे त्यांना जाणवले. जया जोग यांचा हा सुरेल आणि आनंदी प्रवास पुढेही असाच सुरू राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. आपल्या भावना व्यक्त करताना जया जोग म्हणाल्या की, वयाच्या या टप्प्यावर त्या आनंदी आहेत. नुकताच केलेला प्रवासही त्यांना आनंद आणि निवांतपणा देणारा होता. तरीही ज्या गोष्टी मनात डाचत राहिल्या, त्याविषयी लिहावेसे वाटले आणि तेच या पुस्तकात आहे. आयुष्यात त्यांनी आपल्या नावाला साजेसा संघर्ष केला. कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिकतेच्या पातळीवर त्या झगडत राहिल्या. इतर चढउतार आले तरी त्यांनी नेहमी अर्धा भरलेला प्याला पाहण्याची मानसिकता ठेवली. उत्तम शिष्य मिळाल्याचे समाधानही त्यांना मोठे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *