Headlines

'माधुरी' हत्तीण कोल्हापुरात परतणार:पुनर्वसनासाठी 'वनतारा'च्या टीमकडून नांदणीत पाहणी, वर्षभराचा संघर्ष संपणार




कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन संस्थान मठाचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘वनतारा’ आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या निवासासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असून, यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी ‘वनतारा’ची एक उच्चस्तरीय तज्ज्ञ टीम नांदणीत दाखल झाली होती. या टीमने दिवसभर मठाच्या परिसरात तळ ठोकून माधुरीच्या भविष्यातील वास्तव्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा, तिची सुरक्षा आणि दैनंदिन देखभालीच्या जागेची बारकाईने पाहणी केली. माधुरी हत्तीण पूर्वी ज्या ठिकाणी राहत होती, त्याच परिसरात तिच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. ही संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर, या संदर्भातील अहवाल उच्चाधिकार समितीकडे पाठवून तिच्या परतीवर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. जिनसेन संस्थान मठ, नांदणी यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या सुखद बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. मठाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “नांदणी मठासाठी अत्यंत आनंदाची बातमी! आपली लाडकी माधुरी (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यातील सकारात्मक घडामोडींमुळे पुढील एका महिन्यात माधुरी आपल्या लाडक्या नांदणी भूमीत परतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिच्यावर लाखो भाविकांचे प्रेम आहे, ती पुन्हा मठाच्या परिसरात दिसावी हीच सर्वांची प्रार्थना होती. हा भाविकांच्या श्रद्धेचा विजय आहे.” २८ जुलै २०२५ चा ‘तो’ भावनिक निरोप अन् वर्षभराचा संघर्ष माधुरी हत्तीणीला विशेष आरोग्य सुविधा आणि देखभालीसाठी २८ जुलै २०२५ रोजी गुजरात येथील ‘वनतारा’ प्रकल्पात नेण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मठाचे वैभव गेल्याची भावना व्यक्त करत लाखो नागरिकांनी हळहळ व्यक्त केली होती. माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी त्यावेळी कोल्हापुरात लोकांकडून आंदोलन देखील करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तिला पुन्हा आणण्यासाठी मठाकडून आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता या प्रयत्नांना यश येताना दिसत असून, लवकरच नांदणीची भूमी आपल्या लाडक्या ‘माधुरी’च्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *