![]()
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, १५ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. कागदोपत्री दुरुस्ती, देखभाल व विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
.
तालुक्यातील भटोरी शाळेतील विद्यार्थी भिंतीला तडे गेलेल्या वर्गखोल्यांमधे बसून शिक्षण घेत आहेत. गत ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या व आता जीर्ण झालेल्या भिंतींवर पुन्हा टिनपत्रे टाकून रंगरंगोटी करून शाळा दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शाळा दुरुस्तीची कामे निघाल्यास ती कामे जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी किंवा त्यांचे नातेवाइक अथवा मर्जीतील ठेकेदारांमार्फत केली जात असल्याची चर्चा आहे. अनेक शाळांमधील स्वच्छतागृहांची दैनावस्था झाली आहे. पिण्याचे शुद्ध पाणी व विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या पाहिजे असलेल्या वातावरणाचा अभाव असल्याचे म्हटले जात आहे. शिक्षकांकडे शैक्षणिक कार्य सोडून इतर कार्याचा भार देखील शैक्षणिकदृष्ट्या शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर नेण्यातील ठळक अडथळा आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था ही गोरगरीब पालकांना त्यांच्या पाल्यांना महागड्या शाळेच्या दरवाजात नेऊन सोडण्यासाठी परावृत्त करत असल्याचा आरोप आहे. याकरिता संपूर्ण स्ट्रक्चर पूर्णपणे नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे. इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींच्या पद्धतीने शंभर वर्ष शाळेची बांधलेली इमारत त्या स्थितीत राहील, याची परिपूर्ण जबाबदारी ठेवून व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढवून नव्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या गोरगरिबांसाठी असलेल्या शाळांना नवसंजीवनी देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. माझ्या गावाची शाळा ही विद्यार्थ्यांसह संपूर्ण ग्रामस्थांच्या अभिमानाची बाब वाटली, तरच जिल्हा परिषद शाळांचे भविष्य उज्वल ठरेल. अन्यथा काही वर्षांनी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १४१ शाळा असून त्यात ३९५ शिक्षकांची मंजूर पदे आहेत. त्यापैकी ३७० शिक्षक कार्यरत असून काही पदे अद्याप रिक्त आहेत. बरेच शिक्षक शाळेला दांड्या मारून परस्पर गैरहजर राहत असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, १५ शाळांना तातडीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे समजले. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३९५ मंजूर शिक्षकांपैकी ३७० जण सध्या कार्यरत
शाळा दुरुस्ती कामांचा प्रस्ताव पाठवला ^तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक व इतर शाळा मिळून १४१ शाळा आहेत. त्यात शिक्षकांची एकूण ३९५ पदे असून सद्य:स्थितीत २५ पदे रिक्त आहेत. पंधरा शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीचा व इतर शाळांच्या विविध कामांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. – वैशाली रामटेके, गटशिक्षणाधिारी, पंचायत समिती.