![]()
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुंबईत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाचा जोर का वाढला? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात पावसासाठी अत्यंत अनुकूल असे दुहेरी वातावरण तयार झाले आहे. आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि उत्तर छत्तीसगडच्या आकाशात सध्या चक्राकार वारे वाहत आहेत. ईशान्य अरबी समुद्रापासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशावरून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा एक मोठा पट्टा तयार झाला आहे. या दोन्ही हवामान प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून तापमानातही मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच कारणामुळे पुढील ७२ तासांत पावसाचा प्रभाव कमालीचा वाढणार आहे. मुंबईलाही मुसळधार पावसाचा तडाखा मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले आणि वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील काही तासांतही काही भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली. १० जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा पावसासोबतच वाऱ्याचा वेगही वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील तब्बल १० जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुठे कोणता अलर्ट? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे: रेड अलर्ट: पुणे (घाटमाथा परिसर), ऑरेंज अलर्ट : कोकण: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र: नाशिक (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), कोल्हापूर (घाटमाथा). येलो अलर्ट : मुंबई, पुणे (सपाट भाग), नाशिक (सपाट भाग). विदर्भ: बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. संबंधित बातमी वाचा.. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय 21 जुलै सकाळी 8.30 वाजता झालेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत 12.2 मिमी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम धारा कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या वर्षीच्या पावसाळ्यात 21 जुलैपर्यंत राज्यात 380.2 मिमी पाऊस झाला आहे. या कालावधीत सरासरी 431.8 मिमी पाऊस अपेक्षित असतो. हे लक्षात घेता आतापर्यंत 88.1 टक्के पाऊस झाला असून सध्या 11.9 टक्क्यांची तूट पडलेली आहे. परिणामी धरणांमधील साठा फारसा वाढलेला नाही. दरम्यान, बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकण, गोवा तसेच नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पुणे घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पुन्हा मुसळधार:पुणे, नाशिक, कोकणासह विदर्भातही जोरदार पावसाचा अलर्ट, मराठवाड्यातही पावसाची शक्यता