![]()
“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक मूल्ये, शिस्त तसेच शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक विकासासोबतच सामाजिक बांधिलकीवरही विशेष भर देऊन देश-धर्म व भारतीय संस्कृतीचे संवर्धन होणे गरजेचे आहे,’ असे प्रबोधन भजनांच्या माध्यमातून दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे गुरुजी यांनी केले. १ मेपासून सुरू झालेल्या या शिबिरात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून १०३ शिबिरार्थी सहभागी झाले असून, त्यांना भजनांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छता व संस्कृती यांबाबत प्रमोद पोकळे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. या निवासी शिबिरात पहाटे ४.३० ते रात्री ९.३० पर्यंत आदर्श दिनचर्या, थोर महापुरुषांचे चरित्रदर्शन, स्वावलंबन, राष्ट्रभक्ती, सेवा, शिस्त, अंगभूत कलेचे दर्शन, व्यसनमुक्ती, धर्म-ग्रंथांची ओळख, व्यक्तिमत्त्व विकास, अनिष्ट रुढी-परंपरा व अंधश्रद्धा निर्मुलन, श्रमदान आदी अनेक विषयांवर बौद्धिके व बलसंवर्धनार्थ सूर्य-नमस्कार, योगासने, प्राणायाम व भजन-संगीताचे प्राथमिक शिक्षण सेवाभावी शिक्षकांकडून दिले जात आहे. श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार संस्थेद्वारा आयोजित या २१ दिवसपर्यंत चालणाऱ्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली शिबिराचे शिक्षक रवींद्र ढवळे, रुपेश मोरे, कुणाल खडसे, गणेश दरवरे, मयुर इंगळे, सागर मेहकरे, देवागुरू जांभुळे, नयन पऱ्हाड, पुष्कर गुडधे, चेतन पारधी, कुलदीप बोधाने, कुंदन गुडधे, छगनराव मोरे तर व्यवस्थापनाची जबाबदारी रवींद्र वानखडे सांभाळत आहेत. विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे दासटेकडी येथील श्री गुरुदेव सर्वांगीण संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे दिले जातात. जगात संस्कृती व गुरुकुलामुळे प्राचीन काळी जी शैक्षणिक प्रगती, संस्कार, विविध विद्यांचे ज्ञान, स्वयंशासनाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात होते. काहीसे धडे येथे विद्यार्थ्यांना दिले जातात. पहाटे उठून व्यायाम करणे, त्यापासून शरीराला पीळदार व मजबूत बनवणे, धर्म ग्रंथांची ओळख, वाचनाची आवड, मुलांना मोबाइलसह व्यसनां पासून दूर ठेवणे, विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलांना वाव देणे,अंधश्रद्धांपासू न दूर राहण्यासोबतच अनिष्ट रुढी व परंपरांबाबत विचारही न करणे, महापुरुषांचे चारित्र्य वाचून त्यापासून विशेष काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा घेणे, अशाप्रकारे शास्त्रशुद्ध संस्कार केले जातात. हे संस्कार एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी केले जात असल्यामुळे या शिबिराला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Source link
मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन