![]()
राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. मात्र, खासदारकीसोबत दोन अटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे घातल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेतील येवला मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यालाच पक्षातर्फे उमेदवारी मिळाली पाहिजे. दुसरी अट म्हणजे निवडून आल्यावर समीर यांना महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्रिपदही मिळालेच पाहिजे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलगी मंत्री आहे. मुलगा आता आमदार झाला आहे. त्यांच्या एकाच घरात तिघांना संधी, मग माझ्या कुटुंबावरच अन्याय का, असा त्यांचा सवाल आहे. भुजबळांच्या या पवित्र्याने अजित पवार गटात एकच गडबड उडाली. शनिवारी आधी भुजबळांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर दुसरी बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झाली. दोन-दोन तास चाललेल्या या बैठकांतून अंतिम निर्णय झाला नाही. तो रविवारी होऊ शकतो. मात्र, सूत्रांनी सांगितले की, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणाही राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. प्रमोद हिंदुराव, अविनाश आदिक आणि समीर भुजबळ यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र छगन भुजबळ महाराष्ट्रात राहून वारंवार नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात. म्हणून त्यांना दिल्लीत राज्यसभेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत आहे. ७ जून रोजी कोणत्याही क्षणी उमेदवाराच्या नावाची घोषणा होऊ शकते. उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी भुजबळांच्या निवासस्थानी झालेल्या पहिल्या बैठकीस सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. त्यात केवळ नावच नाही, तर विधानसभेतील जागांचे गणित आणि राजकीय पुनर्वसनावरही सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महायुतीमधील जागावाटप आणि पाठिंब्याबाबतची अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही भेट अंत्यत महत्त्वाची मानली जात आहे. माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात : देवेंद्र फडणवीसांचे सुप्रिया सुळेंना उत्तर विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. या प्रकाराला आळा घालण्यासाठी लोकसभेत विधेयक आणू, असेही त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी १५० कोटींचा व्यवहार झाल्याचे म्हटले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजपने लोकशाहीचा खून केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे समजलं तर अशा प्रकारचं विधेयक आणण्याची गरजच पडणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हायला हव्यात. या संदर्भात कुणी विधेयक आणत असेल तर त्याला आपला विरोध नाही. निवडणूक व्यवस्थेत आवश्यक बदल झाले पाहिजेत. राष्ट्रीय नेते होण्याच्या तीव्र इच्छेपोटी भुजबळ दिल्लीत जाण्यास तयार सूत्रांनी सांगितले की, छगन भुजबळ यांची प्रतिमा महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते अशी झाली आहे. राज्यसभेत जाऊन ही प्रतिमा त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, राज्यातील राजकारणात अप्रत्यक्ष सहभागही हवा आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील बदलती राजकीय, सामाजिक समीकरणे पाहता भुजबळ दिल्लीत गेलेले बरे, अशी भावना राष्ट्रवादीतील तरुण नेते व्यक्त करत आहेत. सूत्रांचे असेही म्हणणे आहे की, नवनीत राणांनी भाजपसोबतच राहणार अशी भूमिका घेतल्याने त्यांना संधी मिळणार नाही. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा : राज ठाकरे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा बाहेर काढला. मतपत्रिका नसतील तर निवडणुकीवर बहिष्कार टाका, असे त्यांचे म्हणणे आहे. ते सुप्रिया सुळेंनी मान्य केले. हा मुद्दा त्या ८ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीत मांडणार आहेत. राज यांच्या म्हणण्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Source link
राज्यसभेच्या खासदारपदासाठी छगन भुजबळांच्या अटी-शर्ती:पुतण्या समीरला येवल्यातून विधानसभेची उमेदवारी आणि कॅबिनेट मंत्रिपदही हवे