![]()
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारीसाठी प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक विचारमंथन झाले असून, येत्या आठवड्यात अंतिम उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रात पाठवण्यास पक्ष फारसा उत्सुक नसल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना संधी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे बाहेरील तसेच परराज्यातील नेत्यांच्या ऐवजी राज्यातीलच सुबोध मोहिते किंवा अविनाश आदिक यांच्या सारख्या नेत्यांना दिल्लीत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला दुसरीकडे, राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महायुती म्हणूनच एकत्र निवडणूक लढवणार आहेत. यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पूर्ण एकमत झाले असून जागावाटपाची प्राथमिक चर्चा पूर्ण होऊन त्याचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीमध्ये जो फॉर्म्युला ठरत आहे, त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार आहे. त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना शिंदे गत 3 जागा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गत 2 जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे. कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा? महायुतीच्या या प्राथमिक जागावाटपानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी या जागा येणार आहेत, तर शिवसेनेला ठाणे, नाशिक आणि यवतमाळ हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असून त्यांच्याकडे नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. विधानपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी जारी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल आणि 4 जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. या सर्व प्रक्रियेनंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदान पार पडेल आणि 22 जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
Source link
राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक नेत्यांना प्राधान्य:सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक यांच्या नावांची चर्चा; छगन भुजबळांचा पत्ता कट?