Headlines

रोहिणी खडसेंचा राम शिंदेंवर पलटवार:अहिल्यानगरच्या एका धोंड्याला फार मिरची लागली, कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल!




अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादात आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची भर पडली आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही रोजगाराचा प्रश्न मांडला, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे घ्या असे सांगितले, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिरची लागली,” असा टोला त्यांनी लगावला. नाव न घेता केलेल्या या टीकेचा रोख थेट राम शिंदे यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. ‘हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, पण…’ रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मग त्या धोंड्याने हिंदू संस्कृती जपण्याच्या बाता मारायला सुरुवात केली. पण यांचे हिंदुत्व किती दुटप्पी आहे, हे लोकांनी पाहावे,” असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काही गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख करत, “हे लोक गुंडांना पोसतात, त्यांना मदत करतात. ज्यांनी अनेकांचे जीव घेतले, अनेकांना त्रास दिला अशा लोकांना संरक्षण देणे हा हिंदू धर्म शिकवतो का?” असा सवाल उपस्थित केला. ‘कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल’ रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे घेत राम शिंदेंवर गंभीर आरोप केले. “निलेश घायवाळ, युवराज काशीद आणि अशी आणखी अनेक नावे सांगता येतील. यांना कोणी मदत केली, हे सगळ्यांना माहिती आहे. मी जर यांची संपूर्ण कुंडली बाहेर काढायचे ठरवले, तर त्यांना राजकारणाला रामराम करावा लागेल,” असा इशाराच त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे. वादाची सुरुवात कशी झाली? काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी चौंडी येथे अधिक मासानिमित्त ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावातील मुली आणि जावयांना निमंत्रित करून पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली. मात्र, रोहिणी खडसे यांनी या कार्यक्रमावर टीका करत, “धोंडे जेवणावर खर्च करण्यापेक्षा बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करा,” असा सल्ला दिला होता. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. राम शिंदेंनी काय दिले होते उत्तर? रोहिणी खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राम शिंदे यांनीही जोरदार पलटवार केला होता. “रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचे सांस्कृतिक महत्त्व काय समजणार?” असा टोला त्यांनी लगावला होता. महाराष्ट्राच्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता धोंडे जेवणासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमावरून सुरू झालेला हा वाद आता रोजगार, हिंदुत्व, गुन्हेगारी संबंध आणि वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, रोहिणी खडसे आणि राम शिंदे यांच्यातील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः “कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल” या रोहिणी खडसे यांच्या इशाऱ्यामुळे या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *