![]()
एकीकडे शासन पातळीवर शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींच्या कर्जमाफीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बळीराजाचे वास्तव अद्यापही भीषणच आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी कसा हतबल होतो, याचे मन हेलावणारे आणि तितकेच संतापजनक उदाहरण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातून एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एका शेतकऱ्याच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरा बैल घेण्याची ऐपत नसल्यामुळे या हतबल शेतकऱ्याला चक्क बैलाच्या जागी आपल्या पत्नीला जुंपून शेतातील नांगरणी करावी लागत असल्याचा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. हे विदारक चित्र सरकारच्या कागदी दाव्यांमधील फोलपणा आणि शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला कायमचा संघर्ष उघडा पाडणारे आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बु.) येथील काशिनाथ आणि हौसाबाई गायकवाड या गरीब शेतकरी दाम्पत्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओमध्ये शेतातील नांगराला एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बैलाच्या जागी चक्क शेतकऱ्याची पत्नी जुंपलेली दिसत असल्याने हे विदारक दृश्य कुणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारे आहे. एका मुक्या जनावराच्या जागी शेतकरी मायला नांगर ओढताना पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहात नाही. काही महिन्यांपूर्वीच घेतली होती बैलजोडी काही महिन्यांपूर्वीच तब्बल 1 लाख 20 हजार रुपये खर्च करून या कुटुंबाने बैलजोडी खरेदी केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून यातील एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच बिकट आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पेरणीचा हंगाम तोंडावर आल्यामुळे नवा बैल विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा संकटाच्या वेळी परिस्थितीसमोर हार न मानता, या कुटुंबाने नाईलाजाने एक अत्यंत कठीण निर्णय घेतला आणि चक्क मृत बैलाच्या जागी पत्नी हौसाबाई यांना नांगराला जुंपून शेताची मशागत सुरू केली. या घटनेनंतर शासनाने या पीडित शेतकरी कुटुंबाची तातडीने दखल घेत त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून दुसऱ्यांची शेती बटईने कसणाऱ्या या भूमिहीन कुटुंबाने यंदा दहा एकर जमीन कसायला घेतली आहे. स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना, केवळ याच शेतीच्या भरवशावर त्यांनी आतापर्यंत आपल्या चार मुलींची लग्ने आणि दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. शेतीच्या मशागतीची संपूर्ण मेहनत आणि खत-बियाणांचा खर्च स्वतः करायचा, मात्र उत्पन्नाचा वाटा जमीन मालकाला द्यायचा, अशा अटींवर शेती करणाऱ्या या कुटुंबासमोर आता पेरणीसाठी खते-बियाणे विकत घ्यायची की मृत बैलाच्या जागी नवा बैल घ्यायचा, असा मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. संकटाच्या या काळात शेतीसाठी सुरू असलेल्या त्यांच्या या जीवघेण्या धडपडीचा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूने चित्रित केला. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे, एका बैलाच्या दुर्दैवी मृत्यूने या शेतकरी कुटुंबावर ओढवलेले मोठे संकट आणि हतबलतेतून सुरू असलेला त्यांचा विदारक संघर्ष आता सर्वांसमोर आला आहे. याचसाठी हवी विनाअट सरसकट कर्जमाफी- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले की, लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावात काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला जुंपावे लागले. ही विदारक स्थिती आहे अन्नदात्याची! देशाचे पोट भरावे यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागत असेल तर हे केवळ दुखःदच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदयांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला विशेष बाब म्हणून त्वरित मदत मिळवून द्यावी, ही विनंती! बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठीच हवीय विनाअट सरसकट कर्जमाफी, असे पवार यांनी म्हटले आहे.
Source link
लातूरमधील काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग!:बैलाचा मृत्यू झाल्याने हतबल शेतकऱ्याने पत्नीलाच जुंपले नांगराला, VIDEO