.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रभावी लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, कष्टकरी, श्रमिक घटकांचा आवाज बुलंद केला. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे सामाजिक विषमता, अन्यायाविरोधात जनजागृती घडवून आणली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दांत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वीर लहुजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. शहरात वृक्षारोपण अभियान
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सिद्धार्थनगर येथे त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘रेसिडेन्शियल हायस्कूल’च्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुनील सकट यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. शहरात पूर्णाकृती पुतळा उभारणार: आ. जगताप
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ उभी केली. त्यांनी ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वसामान्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली. शहरात महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत विकासालाही गती मिळत आहे. समाजबांधवांशी चर्चा करून तसेच प्रशासनाची आवश्यक परवानगी व ठराव पूर्ण झाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे पूर्णाकृती पुतळे अहिल्यानगर शहरात उभारण्यात येतील, अशी माहिती आ. जगताप यांनी दिली.
जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लालटाकी भारस्कर कॉलनी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लालटाकी परिसरात विश्व हिंदू परिषदेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. लालटाकी परिसरात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.