Headlines

विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खुलासा:'आमच्याशी कुणी संपर्कच केला नाही', भाजपवरही जोरदार हल्लाबोल




राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “विलीनीकरणाबाबत आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी, अर्थव्यवस्था आणि विरोधकांच्या एकजुटीबाबतही त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली; आता तृणमूलवरही तोच प्रयोग” विरोधी पक्षांतील फुटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. “आधी शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली. आता तृणमूल काँग्रेसबाबतही त्याच प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे.” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या राजकारणावर अप्रत्यक्ष टीका केली. काँग्रेसमध्ये विलीनीकरण?; “कुणीही प्रस्ताव दिलेला नाही” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, त्यांनी ना ते विधान ऐकले आहे ना वाचले आहे. “मी नाना पटोले यांचे विधान ना वाचले ना ऐकले. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.” मात्र, राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “विलीनीकरणासंदर्भात आमच्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही.” यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “पवारांवर टीका केली की हेडलाईन होते” ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता सुळे यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. “गेली बारा वर्षे आम्ही सत्तेत नाही. पण आजही सत्तर वर्षांतील सगळ्या चुकांचा ठपका आमच्यावर ठेवला जातो.” यावेळी त्यांनी एक उदाहरण देत म्हटले, “नवीन सून घरात आली की सुरुवातीला सगळ्या चुका सासूच्या असतात. पण दहा-पंधरा वर्षांनंतरही सासूलाच दोष देत बसायचं का? काही जबाबदारी स्वतःही घ्यावी लागते.” पवार कुटुंबावर टीका करणाऱ्यांबाबत त्या म्हणाल्या, “पवारांवर टीका केली की हेडलाईन मिळते, बातमी होते. त्यामुळे अनेकजण तेच करतात. पण लोकशाहीत मला बोलण्याचा अधिकार आहे, तसाच इतरांनाही आहे.” शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं अमरावती विभागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत विचारले असता सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस दिलासादायक घोषणा झालेली नाही. “कर्जमाफी सरसकट व्हावी ही आमची भूमिका आहे. बळीराजा प्रचंड अडचणीत आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “देशाची आर्थिक परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून आर्थिक संकटावर चर्चा करावी.” “देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरड मोडतंय” देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतीतील संकट यामुळे सामान्य नागरिक अडचणीत आहेत. “राजकारण सुरूच राहील. पण आर्थिक कंबरड ज्या पद्धतीने मोडत चाललं आहे, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.” त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक विषयावर व्यापक चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही केली. ‘ऑपरेशन टायगर’वर हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “दीड-दोन वर्षांपासून हेच ऐकत आहोत. आता कान पकले आहेत. काहीतरी नवीन विचारा.” त्यांच्या या उत्तरामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. व्याही अरुण लखाणींच्या निवडीवर काय म्हणाल्या? नागपूर विधान परिषदेत भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेले उद्योगपती अरुण लखाणी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी कौटुंबिक वातावरणाची माहिती दिली. “आज त्यांची भेट होणार नाही. मी अमरावतीला जात आहे. पण लग्नाला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत रोजच भेट होणार आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची लगबग सुरू झाली असून 16 जूनपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. राजकीय चर्चांपेक्षा शेतकरी आणि अर्थव्यवस्थेवर भर नागपुरातील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चांपासून अंतर राखत शेतकरी, अर्थव्यवस्था आणि लोकशाही संस्थांबाबत चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला असला, तरी विरोधी पक्षांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. आगामी काही दिवसांत या विषयावर शरद पवारांची भूमिका काय असते, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *