Headlines

वृंदा घेणार हरवलेल्या मोहनचा शोध:6 जुलै पासून 'सौभाग्यवती वृंदा मोहन' घेऊन येते रहस्याचा थरार




‘सन मराठी’वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेचा प्रोमो गूढतेने भरलेला असून मालिकेतील मुख्य अभिनेत्री वृंदा आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधताना दिसून येत आहे. प्रत्येक भागात रहस्याचे नवे पदर उलगडत जाणार असून वृंदाला एका अनोळखी कुटुंबाशी तिचा सामना होणार आहे. तिच्या समोर एकामागोमाग एक रहस्यांची मालिका उलगडणार आहे. मोहन खरंच कुठे आहे? तो जिवंत आहे की नाही? त्याच्या गायब होण्यामागे कोणतं गूढ दडलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा वृंदाचा प्रवास प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे. एका साध्या, निरागस स्त्रीचा धाडसी आणि खंबीर प्रवास ही या मालिकेची खरी ताकद आहे. याचसह मालिकेत बऱ्याच लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सुहिता थत्ते, परी तेलंग, अक्षता नाईक, सुखदा बोरकर, स्नेहा मंगल अभिनेता आशिष जोशी, आशिष वझे, किरण डांगे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मालिकेचं नाव ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ असलं तरीही मोहन ही भूमिका नक्की कोणता अभिनेता साकारतोय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. येत्या 6 जुलै पासून रात्री 9:45 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं नामवंत लेखक स्वप्नील गांगुर्डे आणि महाबळेश्वर तर प्रसिद्ध दिग्दर्शक अजय मयेकर करणार असून मालिकेबद्दल ते म्हणाले की, “सन मराठी’ वाहिनीवर प्रत्येक मालिकेतून प्रेक्षकांना एक नवी गोष्ट पाहायला मिळते. वाहिनीवर आता पहिल्यांदाच सस्पेन्स आणि थ्रिल यांचं अनोखं मिश्रण असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत वृंदा हे पात्र अतिशय रंजक आहे. वृंदाचा नवरा हरवलेला असल्यामुळे ती त्याच्या शोधात मुंबईत येते. प्रत्येकजण तिला तिचा नवरा आता या जगात नसल्याचं सांगतो. मात्र ती कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याचा शोध सुरू ठेवण्याचा निर्धार करते. जशी सावित्रीने आपल्या निष्ठा, जिद्द आणि धैर्याच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते, तशीच वृंदाही आपल्या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक संकटाशी दोन हात करते. मात्र या प्रवासात तिच्यासाठी ‘यम’ कोण आहे, हेच तिला माहीत नाहीये.प्रत्येक स्त्रीकडे वृंदासारखी जिद्द, इच्छाशक्ती आणि संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य असावं. कोणतीही परिस्थिती आली तरी न डगमगता तिचा सामना करता आला पाहिजे, हा संदेशही ही मालिका देतीये.” मालिकेत वृंदा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे म्हणाली की, ” वृंदा ही प्रचंड धाडसी आहे. मुंबईत कुणी ओळखीचं नसताना आपल्या नवऱ्याला शोधायला येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. ती तिच्या सौभाग्याला जपण्याचा आतोनात प्रयत्न करतेय. या सगळ्यात तिला प्रेक्षकांच्या साथीची प्रचंड गरज आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना विनंती करते वृंदाला भरपूर आशीर्वाद आणि प्रेम द्या.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *