![]()
पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी १२ वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर आणि वेरूळ-खुलताबाद मार्गावर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसला. अपुऱ्या सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे यंदा पहिल्या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी योग्य नियोजनामुळे पहिल्या श्रावणी सोमवारी ३५ हजार भाविकांनी सुलभ दर्शन घेतले होते. मात्र, यावर्षी नियोजनाच्या अभावामुळे १० हजार भाविकांनाच दर्शन मिळाले. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अवजड वाहतुकीवर बंदी घातली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटींमुळे परिस्थिती बिकट आहे. मंदिर परिसरात अतिवेगाने चालणारी मुरुमाची वाहतूक, धुळीचे साम्राज्य आणि अपूर्ण कामे अपघाताला आमंत्रण देत आहेत. वेरूळमधील मुख्य वाहनतळ विकासकामांसाठी बंद असल्याने रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या वाहनांमुळे तासंतास वाहतूक कोंडी होत आहे. मोफत पाणी, आरोग्य सेवा व गर्दी नियंत्रणाच्या केवळ घोषणाच उरल्याचे चित्र आहे. साताऱ्याहून आलेले दिव्यांग भाविक प्रमोद कंकर आणि तेलंगणाहून आलेले श्रीखर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असून हायवाने मुरमाची वाहतूक सुरू आहे. पार्किंग, रस्ते, सुरक्षेचे नियोजन करणे गरजेचे दर सोमवारी आणि शनिवारी भाविकांची गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने पार्किंग, रस्ते आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि भाविकांमधून केली जात आहे.
Source link
वेरूळमध्ये श्रावणाचा पहिला दिवस ठरला वाहतूक कोंडीचा:10 हजार भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन