Headlines

सरकारकडून ओबीसींची फसवणूक:त्यांना थेट 'ओपन'मध्ये टाकण्याचा डाव; राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोलेंचा आरोप




काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे प्रश्न, MPSC पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळसदृश स्थिती या मुद्द्यांकडे पटोलेंनी राज्यपालांचे लक्ष वेधले. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा कट’ केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करताना नाना पटोले म्हणाले की, “देशामध्ये ४,२०० पेक्षा जास्त ओबीसी जाती आहेत. सरकारने आणि स्वतः पंतप्रधान मोदींनी देशात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले जात नाहीये. उलट, ओबीसींची मोठी फसवणूक केली जात आहे. जनगणनेसाठी जे ४० प्रश्न तयार करण्यात आले आहेत, त्यातील १० नंबरच्या प्रश्नातून असे स्पष्ट दिसते की, ओबीसींना थेट ‘ओपन’ (खुल्या वर्गात) कसे टाकता येईल, याचाच सरकारचा मानस आहे.” हा ओबीसींवर मोठा अन्याय असल्याचे ते म्हणाले. ‘शेतकऱ्यांना कर्नाटकच्या धर्तीवर मदत द्या’ राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. “आम्ही शेतकरी वर्गातील लोक आहोत आणि आज राज्यातील शेतकरी अत्यंत चिंतेत आहे. पावसाअभावी पिके वाळून चालली आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जशी कर्नाटक सरकारने आपल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली आहे, तशीच मदत राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारनेही इथल्या शेतकऱ्यांना द्यावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. MPSC विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या MPSC पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही पटोले यांनी भाष्य केले. स्पर्धा परीक्षांमध्ये होणारा सावळागोंधळ आणि विद्यार्थ्यांचे नुकसान यावर काँग्रेसने सातत्याने आंदोलने केली असून, राज्यपालांनी या विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 14वा दिवस: ही अटीतटीची लढाई, कुणीही घरी बसू नका; मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचे आंतरवालीत एकवटण्याचे आवाहन मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन करत उद्या दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक होणार असल्याचे सांगितले. या बैठकीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *