![]()
“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आठ खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही महाराष्ट्राच्या विकासासाठी नसून, भाजपला ‘डीलिमिटेशन बिल’ पास करण्यासाठी मदत करण्यासाठीच होती. शरद पवारांची पुरोगामी भूमिका ही नेहमीच नाटकी आणि खोटी राहिली आहे,” असा थेट आणि खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडी, भाजप, मराठा-ओबीसी संघर्ष, नीट (NEET) परीक्षा आणि देशभरातील विद्यार्थी आंदोलनावर सविस्तर आणि रोखठोक भाष्य केले. भाजपला रोखणारा एकमेव पर्याय वंचितच महाराष्ट्रातील सद्य:स्थितीवर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “राज्यात सध्या प्रचंड राजकीय अस्वस्थता आहे. जो भाजप नको म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला (MVA) मतदान केले, त्याच पक्षाचे आमदार आणि खासदार फुटून पुन्हा भाजपमध्येच गेले. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि आता उद्धव ठाकरेंचे सहा खासदारही भाजपसोबत गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये, पैशाला आणि ईडीला (ED) न घाबरता भाजपला खऱ्या अर्थाने रोखणारा ‘वंचित बहुजन आघाडी’ हाच एकमेव सक्षम पर्याय आहे. म्हणूनच आज तरुण वर्ग आणि राजकीय जाणकार मोठ्या संख्येने वंचितकडे आकर्षित होत आहेत.” सुप्रिया सुळेंच्या ‘मोदी भेटी’वर प्रश्नचिन्ह आणि पवारांवर टीका सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीवर थेट संशय व्यक्त करत सुजात म्हणाले, “सुप्रियाताईंनी काल जाहीर केले की ही भेट महाराष्ट्राच्या प्रश्नांवर होती, पण हे धादांत खोटे आहे. खरी चर्चा ही ‘डीलिमिटेशन बिल’ (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) पास करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांची मदत घेण्यावर होती. शरद पवारांनी नेहमीच पडद्यामागून भाजपला साथ दिली आहे. 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा देणे असो वा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, या सर्व गोष्टी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच झाल्या आहेत. त्यांची पुरोगामी भूमिका नेहमीच महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळ फेकणारी आणि नाटकी राहिली आहे.” भाजपला शेल कंपन्यांसारखे ‘शेल पक्ष’ लागतात भाजपच्या राजकारणावर सडकून टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले, “ज्याप्रमाणे काळा पैसा फिरवण्यासाठी ‘शेल कंपन्या’ वापरल्या जातात, तसाच वापर भाजप आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचा ‘शेल पक्ष’ म्हणून करत आहे. फोडलेले आमदार आणि खासदार आधी या शेल पक्षांमध्ये घ्यायचे आणि नंतर त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्यायचे, हे भाजपचे मॉडेल आहे.” मराठा-ओबीसी वाद भाजपचीच स्ट्रॅटेजी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे, ज्याने या वादावर स्पष्ट तोडगा दिला. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल, याची ‘ब्लूप्रिंट’ बाळासाहेब आंबेडकरांकडे तयार आहे. भाजपने नेहमीच ‘डिव्हाईड अँड रुल’ चे राजकारण केले आहे. आधी हिंदू-मुस्लीम, नंतर मराठा-ओबीसी आणि आता बौद्ध-मातंग समाजात भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम भाजप करत आहे.” नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा “शिक्षण आणि आरोग्य हे राज्यांचे विषय आहेत. त्यामुळे ‘नीट’सारखी परीक्षा लादून केंद्राने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. तामिळनाडूमध्ये जे ‘बॅन नीट’ आंदोलन सुरू आहे, तेच भारीप बहुजन महासंघाचे 2013 पासूनचे धोरण आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि ‘जेन झी’ आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीचार्जवरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हेही वाचा… सोलापुरात लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगेंवर टीकास्त्र:म्हणाले- चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली तर थयथय नाचतायत, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोलापुरातून जोरदार पलटवार केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत हाके यांनी सरकारसह ओबीसी नेत्यांनाही लक्ष्य केले. “कुणबीची चार प्रमाणपत्रे रद्द झाली तर जरांगे थयथय नाचत आहेत. मग ओबीसींच्या आरक्षणाचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलापूर दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सुप्रिया सुळेंची मोदींशी भेट डीलिमिटेशन बिलासाठीच!:शरद पवारांची पुरोगामी भूमिका नेहमीच नाटकी; सुजात आंबेडकरांची जोरदार टीका