![]()
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी निधीचे समान वितरण, टंचाई, कृषी-पशुसंवर्धन अन् शिक्षण या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नावरून पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नवोदीत सदस्यांनी अभ्यास
.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमतासह भाजपची सत्ता आली. त्यानंतर विषय समिती सभापती अन् सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. शुक्रवारी (दि. १५) अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा झाली. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, कृषी-पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण- आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरवातीला सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक सभागृहापुढे ठेवण्यात आले. समाजकल्याण समितीच्या वैयक्तिक योजनांचा लाभ जिल्हा परिषदेच्या स्व:उत्पातून देण्यात येतो, त्यामुळे फक्त विषय समिती ऐवजी सर्व सदस्यांनी दिलेल्या लाभार्थीच्या नावं योजनेचा लाभ देताना घ्यावा. तसेच, आरोग्य विभागतर्फे आैषधांच्या खरेदीसाठी वाढीव तरतूद करावी, अशी मागणी अतुल पवारप यांनी केली. त्यास अण्णा ढाळे, दादा लवटे यांनी अनुमोदन देत चर्चेत सहभाग घेतला. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या वर्षांसाठी तब्बल ८५ कोटी ७० लाख ९०, २४९ कोटी निधी मिळाला आहे. प्रशासकीय राजवटीत रोखून ठेवलेला निधी प्रत्येक गटातीला गावांना समान मिळावा. स्थानिक ग्रामपंचायत आपल्या गटाचा की विरोधी याबाबत विचार न करता सर्व निधीचे वाटप करा, अशी मागणी सचिन जाधव यांनी केली. नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद आवारात व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव मांडला. पृथ्वीराज सावंत यांनी माढा चौकात व्यावसायिक गाळे उभारण्याची सूचना केली. अतुल पवार यांनी जागा भाडेतत्त्वावर देण्याची मागणी सूचना केली. नेहरू वस्ती योजनेतील स्वच्छता, तसेच पंढरपूर येथील बंद वसतिगृह पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. बोरामणी गटातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा मुद्दाही उपस्थित झाला.
जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते नसल्याने अनेक विषय भरकटल्याचे चित्र होते. अखेर, सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी हस्तक्षेप करत चर्चा आटोपती घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढील सभेत सविस्तर चर्चा करण्याचे आणि आठ दिवस आधी लेखी माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
‘जलजीवन मिशन’च्या ठेकेदारीच्या प्रश्नांमध्ये आम्हाला सारस्य नाही. पण, ती महत्वकांक्षी योजना विस्कळीत झालीय. अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी पुरवठा सुरु झालेला नाही, त्यामुळे लोकांमध्ये रोष असल्याने त्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन गावकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी भाजपच्या गटनेतच्या रश्मी बागल यांनी केली. जिल्ह्यातील एकूण १००९ कामांसाठी ३७ टक्के निधी मिळाला असल्याने कामं प्रलंबित असल्याचे कार्यकारी अभियंत्यांना सभागृहात स्पष्ट केले.