![]()
तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या दोन प्रमुख शिवरस्त्यांवरील अतिक्रमणावर महसूल प्रशासनाने अखेर हातोडा फिरवला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत खिर्डी ते नांद्राबाद आणि कागजीपुरा ते मावसाळा या दोन मार्गांवरील अतिक्रमणे हटवून हे रस्ते नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. खिर्डी ते नांद्राबाद हा रस्ता सरकारी नकाशानुसार १२ फूट रुंदीचा आहे. मात्र, अतिक्रमणांमुळे शेतीमाल वाहतूक करताना शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दुसरीकडे, कागजीपुरा ते मावसाळा या शिवरस्त्याचा प्रश्न रेंगाळलेला होता. अखेर महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत हा रस्ताही पूर्णपणे मोकळा केला. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड व तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विजय चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी माधवी हिवरकर आणि भूमी अभिलेख कर्मचारी चव्हाण यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी केली आणि रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला केला.
Source link
खुलताबाद येथील दोन शीवरस्ते अतिक्रमणमुक्त:खिर्डी-नांद्राबाद व कागजीपुरा-मावसाळा मार्ग मोकळे