Headlines

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎




मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व त्याची पंखे दाखवून, हाच का तो शुद्ध पाणीपुरवठा, असा सवाल विचारण्यात आला. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खानापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अप्पर वर्धा धरण (नळ दमयंती सागर) असूनसुद्धा खानापूर गावातील महिला, शेतकरी, मजूर व शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या मते, यापूर्वी प्रशासनाच्यावतीने गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अधिग्रहित करून खानापूर येथील घरोघरी पाणीपुरवठा केला जात होता. परंतु आता ग्रामपंचायतच्या शून्य नियोजनामुळे खानापुरवासियांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मिळेल तेथून पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची कॅन विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप भदाडे यांनी खासदार अमरभाऊ काळे यांना माहिती दिली. खासदार महोदयांनी लगेच बीडीओ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यामुळे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय, खानापूर येथे दाखल झाले. येथे पोहोचताच गावकऱ्यांनी एकच हल्लाबोल करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खानापूरचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी विजय ठाकरे, अन्सार मन्सुरी, मंगेश बोराळकर, हरी खडसे, दिनेश पानपगार, प्रदीप ठाकरे, योगेश ढोमणे, संतोष तिहीले, तेजस भदाडे, गोकुल ठाकरे यासह शेकडो ग्रामवासी उपस्थित होते. कर न भरण्याचा निर्धार एकतर नागरिकांना दहा-दहा दिवस पाण्याची वाट पहावी लागते. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे विकासाच्या घोषणा नको. खानापुरला हक्काचे पाणी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कर भरणाऱ्या जनतेला हक्काचे पाणी मिळत नसेल तर यापुढे कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाही, अशी भूमिकादेखील गावकऱ्यांनी घेतली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *