Headlines

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर पदावर पदोन्नती; गत सप्टेंबर महिन्यात झाली होती कर्नलपदी बढती




मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांचे लष्करी करिअर पूर्णतः ठप्प झाले होते. त्यांनी तब्बल 9 वर्षे तुरुंगात काढली. त्यानंतर 2017 मध्ये जामीन मंजूर झाला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. पण त्यांच्या बढतीचा व सेवाज्येष्ठतेचा मुद्दा प्रलंबित होता. गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून निर्दोष सुटका केली. त्यानंतर 2 महिन्यांतच म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे एका याचिकेद्वारे आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने प्रमोशन व इतर लाभ मिळावेत अशी मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने त्यांची मागणी मान्य केली. कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा पदोन्नतीवर असलेला दावा न्याय आहे. त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी देण्यास हरकत नाही. त्यांच्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्यांची निवृत्ती स्थगित ठेवण्यात यावी, असे खंडपीठाने 16 मार्च 2026 रोजी दिलेल्या आपल्या निकालात म्हटले आहे. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. पण आता त्यांच्या निवृत्तीला स्थगिती मिळाली आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार प्रस्तुत बढती म्हणजे कर्नल पुरोहित यांच्या तुरुंगवास व खटल्यादरम्यान वाया गेलेल्या वर्षांची एकप्रकारे भरपाईच आहे. त्यांची कारकीर्द विनाव्यत्यय सुरू राहिली असती, तर आज ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले असते. आता ब्रिगेडियर म्हणून ते एका वरिष्ठ कमांडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा सक्रिय होतील. कोण आहेत कर्नल पुरोहित? लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे भारतीय लष्करातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांना हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. जम्मू-कश्मीरमधील अतिरेकी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मालेगाव शहरात 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात 6 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले. हा स्फोट एका दुचाकीमध्ये लपवलेल्या स्फोटकांद्वारे झाला होता. तपासात ही दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर झालेल्या तपासात कर्नल पुरोहित यांचे नाव पुढे आले होते. कर्नल पुरोहित यांनी अभिनव भारत नामक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून या स्फोटाचा कट आखला, तसेच स्फोटासाठी स्फोटकेही पुरवली, असा त्यांच्यावर आरोप होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *