![]()
ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता झाली. या समारोपप्रसंगी आयोजित विशेष काल्याच्या कीर्तनात नामदेव शास्त्री बाबांच्या अमृततुल्य वाणीने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले. महंत नामदेव महाराज शास्त्री म्हणाले, तब्बल ६६ वर्षांपूर्वी संत भगवानबाबांनी या गावात सप्ताहाची परंपरा सुरू केली आणि याच भूमीत स्वतः काला करून भक्तांना अध्यात्माचा संदेश दिला होता. त्यामुळे हे अकोले गाव अतिशय भाग्यवान आहे. भगवानगडाची महती आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून विविध राज्यांतून भाविक गडावर दर्शनासाठी येत आहेत. परिसरातील लोक जेव्हा ‘आमच्या गडावर चला’ असे अभिमानाने सांगतात, हीच भगवानबाबांच्या भक्तीची आणि गडावरील प्रेमाची खरी साक्ष आहे. भगवानगडावरील शैक्षणिक आणि आध्यात्मिक परंपरा खूप मोठी आहे. गडावरील विद्यार्थ्यांना योग्य संस्कार आणि उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याने, येथील प्रत्येक विद्यार्थी समाजात हिऱ्याप्रमाणे आपली चकाकी दाखवत आहे. गेल्या वीस वर्षांत भगवानगडावर जे काही विविध भव्य विकासकामं झाली आहेत आणि गडाचे स्वरूप जे अधिक दिव्य झाले आहे, त्याचे सर्व श्रेय माझ्या गडावर प्रेम करणाऱ्या भक्तांनाच जाते. या सोहळ्यात सलग सात दिवस प्रसिद्ध भागवताचार्य प्रकाश महाराज साठे यांनी श्रीमद्भागवत कथेच्या माध्यमातून भाविकांना मार्गदर्शन केले. तर व्यासपीठ चालक म्हणून आचार्य शिवाजी महाराज रायपुरे (बुलढाणा) यांनी सेवा बजावली. सप्ताहादरम्यान दररोज राज्यातील विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडली. महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
Source link
भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन