Headlines

मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय असंवैधानिक:सरकार मनोज जरांगे समोर लाचार – लक्ष्मण हाके




मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली आहे. “इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा शासनाचा निर्णय असंवैधानिक असून, ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आहे. सरकार मनोज जरांगेंसमोर लाचार झाले असून, झुंडशाहीला बळी पडले,” असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही हाके यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील समाजांप्रमाणे विविध शासकीय योजना आणि सुविधा मिळाव्यात यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला होता. अंतरवाली सराटी येथे त्यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. नुकत्याच काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे विविध लाभ देण्याचा मार्ग खुला झाला आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक असल्याची भावना समाजातील विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र, याच निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारवर टीका केलीये. नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके? पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित केले. “ओबीसी समाजाला ज्या योजना दिल्या आहेत त्या अभ्यासपूर्ण आहेत. मात्र, त्याच योजना मराठा समाजासाठी लागू करताना कोणते निकष लावले गेले? कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला? याचे लॉजिक सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली. “हे सरकार झुंडशाहीला बळी पडले असून, मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर लाचार झाले आहे. कोणीतरी आंदोलनाला बसले म्हणून सरकार असे निर्णय घेऊन भीक घालत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना मराठा समाजाला मोठा निधी दिला जात असल्याचा आरोप करत, “ओबीसींना सरकारने आतापर्यंत काय दिले, याची श्वेतपत्रिका जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजात तीव्र असंतोष या निर्णयामुळे ओबीसी समाजात सरकारच्या धोरणांबद्दल प्रचंड चीड आणि नाराजी असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. “शासन आम्हाला जाणीवपूर्वक बेदखल करत आहे. आम्ही आमचा रोष कशा प्रकारे व्यक्त करू, हे येणाऱ्या काळात सरकारला समजेलच,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच या निर्णयातून सरकारने मराठा समाजाचीही फसवणूक केल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी नेत्यांना हाकेंचे आव्हान ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असतानाही महाराष्ट्रातील एकही मोठा नेता यावर बोलायला तयार नाही, याबद्दल खंत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. लक्ष्मण हाके यांनी थेट नाव घेत राज्यातील बड्या नेत्यांना आव्हान दिले. “चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील… तुम्ही ओबीसींच्या प्रश्नांवर बोलणार आहात की नाही? हे एकदा स्पष्ट करा. जर तुम्ही बोलणार नसाल, तर स्वतःला ओबीसी नेते म्हणवून घेणे बंद करा,” असे लक्ष्मण हाके म्हणाले. राज्यातील ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *