![]()
गावाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नदीपात्रातील गाळ काढणे,
.
सोनईतील रामझिरा मंदिर परिसर, दशक्रिया विधी घाट, मारुती मंदिर परिसर, दरंदले अमरधाम परिसर, लांडेवाडी रोड परिसरातील दरंदले वस्ती आदी भागांमध्ये स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत श्रमदानाद्वारे नदी संवर्धनात मोलाचे योगदान दिले. कौतुकी नदी ही सोनईच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नदीपात्रातील गाळ काढल्याने आणि स्वच्छता केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच स्वच्छतेमुळे नदी परिसर अधिक आकर्षक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या जलसंवर्धनविषयक धोरणातून यापूर्वीही नेवासा तालुक्यातील विविध गावांमध्ये नद्या व ओढ्यांवर बंधारे उभारण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे तालुक्यात जलसाठ्यात वाढ होऊन जलसंवर्धनाची व्यापक चळवळ निर्माण झाली. परिणामी नेवासा तालुका ‘सुजलाम सुफलाम’ करण्याच्या दिशेने महत्त्वाची वाटचाल करत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. कौतुकी नदी स्वच्छता अभियानामुळे केवळ नदीचे सौंदर्य वाढत नसून पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन आणि सामाजिक सहभागाचे प्रभावी उदाहरणही निर्माण होत आहे. भविष्यातही ही मोहीम सातत्याने राबवून नदी परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कचरा नदीत टाकू नका; घंटागाडीतच द्या सोनई गावातील व्यावसायिक व नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा कौतुकी नदीमध्ये टाकू नये. ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतच कचरा देऊन या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन सोनईच्या माजी उपसरपंच सविता राऊत यांनी केले.