![]()
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, घाटमाथ्यासह महाबळेश्वर, नवजा, कोयनानगर आणि पाटण परिसरात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासांत ७० मिमी पावसाची नोंद झाली असून, कोयना धरणातील पाणीसाठ्यातही स
.
गेल्या २४ तासांत महाबळेश्वर येथे ७० मिमी, नवजा येथे ४१ मिमी, तर कोयनानगर येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. पाटण तालुक्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, मान्सूनच्या सुरुवातीला पाथरपुंज येथे १७४ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली होती.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा वाढून ९.३९ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. २३ जून रोजी हा साठा ८.६३ टीएमसी होता. सध्या धरणात सुमारे २,२५० क्युसेक पाण्याची आवक सुरू असून जलसंपदा विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, महाबळेश्वर–वाई मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. प्रशासनाने तातडीने यंत्रणा राबवून दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सततच्या पावसामुळे वेण्णा नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसामुळे ठोसेघर, भांबवली, ओझर्डे तसेच इतर धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, घाटमाथा भागात दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा…
राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी
अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सविस्तर बातमी वाचा…