Headlines

संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार – रविकांत तुपकर




कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा परिणाम तुपकर यांनी सांगितले की, २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफीपासून वंचित ठेवणारी अट रद्द करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली २०२५-२६ ची अटही हटवण्यात आली असून, प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा कोणाचाही उपकार नसून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील बुलढाण्यातील अन्नत्याग आंदोलनापासून मुंबईतील विधानभवनापर्यंत उभारलेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय बदलावा लागला, असा दावा करत तुपकर म्हणाले की, हा संघर्ष अजून संपलेला नाही. सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, सोयाबीन आणि कापसाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई, वीज, पीककर्ज आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची सध्याची ५० हजार रुपयांची मर्यादा वाढवून ती किमान दीड लाख रुपये करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी पुन्हा केली. “घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून मुंबई गाठणाऱ्या, अटक, उपासमार आणि संकटाची पर्वा न करता संघर्ष करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. हा विजय शेतकऱ्यांचा आहे आणि शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. नेमक्या कोणत्या दोन अटी झाल्या रद्द? २०१९ च्या कर्जमाफीचा निकष: २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफीतून वगळण्याचा अन्यायकारक निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय आता बदलण्यात आला असून, त्या शेतकऱ्यांनाही नव्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. २०२५-२६ ची अट रद्द: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावलेली २०२५-२६ ची जाचक अट हटवून त्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांनी केलेली पोस्ट.. हेही वाचा.. मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान राहील. मंगलप्रभात लोढा जी तुमचं हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं आहे. तुम्ही हे वक्तव्या मागं घेतलं पाहिजे आणि देशातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *