![]()
अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, ४ ऑगस्टनंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी मागील विधानसभा निवडणुकीची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत. १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीचे भाग करून ग्रामपंचायतनिहाय याद्या तयार केल्या जात आहेत. या प्रारुप याद्या २४ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रारुप यादीवर २९ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी घोषित केली जाईल. यानंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता राजकीय पक्षांकडून वर्तवली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण ५५५ ग्रामपंचायतींची मुदत २०२४-२५ मध्ये संपली आहे. सध्या या ग्रामपंचायतींवर पूर्वीच्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण १० जुलै रोजी अंतिमरित्या प्रकाशित करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने २०२४-२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि २०२६ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, संगणक प्रणालीद्वारे मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित कार्यक्रमाची सविस्तर माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील मतदारांनी आपले नाव योग्य प्रभागात असल्याची खात्री करून घ्यावी. हरकती व सूचनांसाठी दिलेल्या मुदतीत आवश्यक बदल करता येतील. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित कार्यक्रमानुसार सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
Source link
555 ग्रामपंचायतींच्या निवडणुका:अमरावती जिल्ह्यात ऑगस्टमध्ये निवडणुकीची घोषणा अपेक्षित, 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी