![]()
राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला असून, राज्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असली, तरी मुंबईसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. कमी दाबाचा पट्टा आणि ‘येलो अलर्ट’ बंगालच्या उपसागरात १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत स्थिर असल्याने राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि घाटमाथ्याला इशारा हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहील. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच या अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. उपनगरांत पाणी साचले, विद्यार्थ्यांचे हाल मुंबई आणि उपनगरांत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड यांसारख्या सखल भागांत पाणी साचले आहे. ऐन शाळेच्या वेळेत पाणी साचल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक कोंडी होण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला होता. दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय, अशी भीती होती. मात्र, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सर्वदूर सुरू झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांना मोठे जीवदान मिळाले. हा पाऊस बळीराजासाठी दिलासादायक ठरणार आहे. हेही वाचा.. देशाच्या 70% भागात ढगाळ वातावरण:25 जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट; राजस्थानच्या 3 जिल्ह्यांतील पारा 41 डिग्रीच्या वर इस्रोच्या उपग्रह प्रतिमांनुसार, देशाच्या सुमारे 70% भागावर मान्सूनचे ढग दाटले आहेत. पुढील 25 जुलैपर्यंत उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतासह देशाच्या 60% पेक्षा जास्त भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 24% कमी आहे. राजस्थानमध्ये मान्सूनने विश्रांती घेतल्याने उष्णता वाढू लागली आहे. बिकानेर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये रविवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. राज्यभरात कुठेही जोरदार पाऊस झाला नाही. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार:हवामान विभागाकडून येलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भासह पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज