![]()
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सध्या बँकांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. कर्जमाफीच्या निकषांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये दररोज चौकशीसाठी गर्दी वाढत आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने खरीप हंगामातील पेरण्या आणि शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज, कर्जमाफी आणि पुढील कर्ज वितरणाबाबत मोठी चिंता सतावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बँकांमध्ये जाऊन आपल्या कर्ज खात्याची माहिती घेत असून, आपण कर्जमाफीसाठी पात्र आहोत की नाही, याबाबत चौकशी करत आहेत. याद्या जाहीर करण्यात आलेल्या नसल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे. शासनाने निश्चित निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात असले, तरी अधिकृत यादी जाहीर न झाल्याने अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.
Source link
शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये फेऱ्या वाढल्या; अद्यापही कर्जमाफीबाबत संभ्रम कायम, निकष व लाभार्थी यादी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी