![]()
अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या, तर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने कौंडण्यपूरचे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू पांडुरंगाच्या कृपेची अनुभूती होती आणि प्रत्येक भाविकाच्या हृदयात विठू-रखुमाईच्या दर्शनाची अखंड तळमळ दाटून आली होती. सुमारे चार तासांची दर्शन प्रतीक्षासुद्धा भक्तीच्या ओढीपुढे कमी वाटत होती. विठूनामाचा अखंड जयघोष, ओठांवरील अभंग आणि डोळ्यांत दाटलेली दर्शनाची आस अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी २५ जुलैला आषाढी एकादशीनिमीत्त कौंडण्यपुरात २० हजारांहून अधिक भाविकांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेत, भक्तीचा अद्वितीय सोहळा अनुभवला. कौंडण्यपूरला विदर्भाचे पंढरपूर म्हणतात. शनिवारी विठ्ठल-रुक्मिणी संस्थानात उत्सव झाला . टाळ-मृदंगाचा गजर, महिलांतर्फे गायली जाणारी विठ्ठलाची गाणी व भजने, दर्शनासाठी रांगेत चालणारे भक्त असे या मंदिर परिसराचे चित्र होते. संस्थानचे सहसचिव सत्यनारायण चांडक व अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी पहाटे ६ वाजता विठ्ठल रूक्मिणी मातेची महापूजा व अभिषेक केला. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू झाले. तेव्हापासून ते रात्रीचे आठ वाजताही भाविकांची गर्दी कायम होती. या वेळी मंदिराचे अध्यक्ष नामदेव.अमाळकर, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक प्रशांत गावंडे यां च्या उपस्थितीत श्रींची पूजा,अभिषेक आरती झाली. या वेळी कुऱ्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कौंडण्यपूर येथून दरवर्षी पंढरपूरला पालखी जाते. वारीसोबत जाणाऱ्या या पालखीचे हे ४३२ वे वर्ष आहे. त्यावरुन या मंदिराची प्राचीनता लक्षात येते. यावर्षी पालखीसोबत सुमारे ३०० वारकरी पंढरपूरला गेले. मंदिरांचे विश्वस्त सुरेश चव्हाण, ह.भ.प.पंकज महाराज महल्ले यांच्या नेतृत्वात ३३ दिवस पायी चालून ८७५ किलोमीटरचे अंतर या भाविकांनी पार केले. पंढरपुरातील आठवडाभराच्या मुक्कामानंतर ते २९ जुलैला याठिकाणी परत येतील. त्यानंतर ३० जुलैला दहिहंडी आणि महाप्रसाद होईल. गोपालनगर, साईनगर, महावीरनगर, विजयपथ नगर, सिपना महाविद्यालय परिसर, यमुना हाऊसिंग सोसायटी, गायत्रीनगर आदी भागातील नागरिकांनी पवार यांच्या शेतातील विठ्ठल मंदिरात पांडुरंगाची मनोभावे पूजा केली. पवार यांची ही बाग पूर्वी गुलाबाची बाग म्हणून प्रसिद्ध होती. तीन-चार वर्षापूर्वी तेथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले आहे. अंबानगरीत पांडूरंगाचा जयघोष, मंदिरांमध्ये गर्दी अमरावती | ‘विठ्ठल रुक्मिणी’च्या नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा नाद, भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या भक्तीच्या लाटा… अशा चैतन्यमय, भक्ती भावपूर्ण वातावरणात शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त शहर व जिल्हा न्हाऊन निघाला. सर्वत्र विठूनामाचा जयघोष घुमला. भाविकांच्या अलोट उत्साहाने वातावरण विठ्ठलमय झाले होते. पटवीपुरा -बुधवारा येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. विठूरायाच्या दर्शनासाठी प्रत्येकाला किमान अर्धा तास थांबावे लागत होते. आज भल्या पहाटेपासूनच शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दिवसभर मंदिरे भाविकांच्या गर्दीने ‘हाऊसफुल्ल’ झाली होती. शहराच्या विविध भागांतून रथारूढ विठ्ठल-रुक्मिणीची मनमोहक पालखी आणि भव्य दिंडी-फेरी काढण्यात आली. “ज्ञानबा तुकाराम” आणि “जय हरी विठ्ठल”च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. अबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण भक्तीच्या रंगात रंगून गेलेले पाहायला मिळाले. पटवीपुरा-बुधवारा येथील प्राचीन विठ्ठल मंदिराप्रमाणेच नवाथे प्लॉट येथील मंदिरातही दिवसभर विठ्ठल भक्तांची ये-जा सुरु होती. अशाप्रकारे विठुरायाच्या दर्शनाने आणि नामास्मरणाने प्रत्येक भाविकाचे मन प्रसन्न झाले असून, संपूर्ण जिल्हा भक्तीच्या अथांग सागरात न्हाऊन निघाला आहे. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर ते पंढरपूर पायी पालखी वारीची ४३२ वर्षांची परंपरा गोपालनगर, साईनगरवासीयांनी घेतले दर्शन
Source link
कौंडण्यपुरात दर्शनासाठी 4 तास प्रतीक्षा:विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 20 हजारांहून अधिक भाविक रांगेत