छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (28 जुलै) शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने ‘छात्र की गूंज’ उपक्रमांतर्गत ‘छात्र विजयी मार्च’ काढला. नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्
.
यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ अटक करण्याची, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागण्याची मागणी केली. प्रधान यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र सहप्रभारी रेहाना चिस्ती, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
या मार्चची सुरुवात पैठणगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचे ध्वज, संविधानाचे संदेश आणि विद्यार्थी हिताचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘छात्रो के सन्मान में – राहुल गांधी मैदान में’ आणि परीक्षा घोटाळ्याविरोधातील जोरदार घोषणांनी पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक ते शहागंज परिसर दणाणून गेला होता.
शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यापाशी मार्चचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची सामूहिक शपथ घेतली. यानंतर ‘गांधी भवन’ येथील पक्ष कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती म्हणाल्या, “काँग्रेस हा संविधान, लोकशाही आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी आणि वाढती बेरोजगारी यांवर केंद्र-राज्य सरकारला धारेवर धरत कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये काँग्रेसची विचारधारा पोहोचवावी.”
या मार्चमध्ये माजी मंत्री अनिल पटेल, नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, राजेश मुंढे, संदीप ढव्हळे पाटील, अशोक डोळस, माजी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, विश्वास औताडे, सागर नागरे, अभिषेक शिंदे, अदनान किरमानी, सरोज जेकब, हेमा पाटील, सुरेखा पानकडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
