![]()
परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चितेगाव-पांगरा आणि चितेगाव-बोकूडजळगाव या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गांवर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून, शालेय विद्यार्थी, वाहनचालक आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पाण्याखालील खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दररोज शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागत असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, अनेक प्रवाशांच्या गाड्या पाण्यातच बंद पडत आहेत. स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती,बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याआधीही या परिसरातील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. सध्याचा पावसाळा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, खड्डे बुजवावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
Source link
चितेगाव-पांगरा रस्त्याची दुरवस्था:विद्यार्थ्यांचे हाल, पालकांकडून संताप व्यक्त