.

लखमापूर फाटा ते कादवा कारखाना या रस्त्यावर महिनाभरापासून जीवघेणे खड्डे पडले असून, १० वेळा तक्रारी करूनही बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे पाठ फिरवली. अखेर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘आमच्यासाठी तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते’ असा फलक लावला. तरीही अधिकाऱ्यांना जाग न आल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत मुरूम व जेसीबीच्या मदतीने खड्डे बुजवत बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविला.
तालुक्यातील लखमापूर फाटा ते कादवा कारखाना या रस्त्याचे काम अवघ्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी निकृष्ट काम झाल्याचा आरोप असून, अल्पावधीतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. लखमापूर फाटा तसेच ओम साई मंगल कार्यालयाजवळील खड्ड्यांची पावसामुळे अवस्था अधिकच गंभीर झाली आहे. ग्रामस्थांनी महिनाभरापासून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची मागणी करूनही ठोस कार्यवाही झाली नाही. {उर्वरित पान. २
लखमापूर फाटा ते कादवा कारखाना रस्ता खड्ड्यांत गेला आहे. नागरिकांनी आजपर्यंत किमान दहा वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने संतप्त नागरिकांनी स्वखर्चाने ९ ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून डागडुजी केली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे व खासदार भास्कर भगरे यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी याच रस्त्यावरून नेहमी प्रवास करतात. लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. दुचाकीसह, ऊस वाहतुकीदरम्यान अपघात वाढले असून, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. नेत्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला.