![]()
अहोरात्र देशसेवेचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे संकुलातील विद्यार्थिनींनी यंदाही २७०० सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला. रक्षाबंधनाच्या दिवशी सैनिकांना शक्यतो बहिणीची राखी मिळालेली नसते. त्यामुळे सीमेवरील सैनिक स्वतः एकमेकांना राखी बांधतात. राखी ही बहीण-भावाचे नाते अतूट करणारी असते. हीच मानसिकता प्रबळ होऊन विद्यार्थिनींनी १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधनापर्यंत सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राख्या मिळाव्यात यासाठी १९ ऑगस्ट रोजी ‘राखी हम बहनों की, रक्षा वीर जवानों की’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संकुलातील विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना २७०० राख्या, भेटकार्ड व प्रेरणापत्रक तयार करून पाठविले व शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आर. बी. गायकवाड यांनी रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असून, कुठलाही भाऊ बहिणीच्या प्रेमापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेने हा स्तुत्य उपक्रम मागील आठ वर्षांपासून सुरू केला आहे. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे म्हणाले की, हा उपक्रम राबवताना विद्यार्थी स्वतः राख्या बनवतात. यातून मुलांना श्रमाचे महत्व कळते व नवनिर्मितीचा आनंदही मिळतो. कार्यक्रमास अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, सुदाम सोनवणे, अमोल सोनवणे, मकरंद सोनवणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा म्हस्के, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी | साकोरा सारताळे आश्रमशाळेत १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष लढाई लढलेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भारताच्या सीमेवर सियाचिन ग्लेशियर येथे कर्तव्य बजावत असलेल्या १६, मराठा लाईट इन्फंन्ट्री बटालियन युनिटसाठी ५०० राख्या पाठविण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. संस्था सरचिटणीस रमेश पगार व कोषाध्यक्षा नम्रता पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाईक सुभेदार मोहिते, हवालदार शंकर थेटे, केवळ बोरसे, सेवानिवृत्त सैनिक फेडरेशन तालुकाध्यक्ष नानासाहेब काकळीज, प्रभाकर पगारे, हवालदार कैलास व्हडगर, हवालदार गणेश ढोकरे, हवालदार आबासाहेब सोमवंशी आदी सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक फेडरेशन नांदगाव तालुकाध्यक्ष नानासाहेब काकळीज यांनी सैनिकांचे खडतर जीवन आणि ‘राष्ट्र सर्वोतोपरी’ या भावनेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच तरुणांनी सशस्त्र दलात भरती होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पगार यांनी सैनिकांच्या निस्सीम देशप्रेमाला मानवंदना देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रमशाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन दीपक सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.
Source link
2700 सैनिकांसाठी येवल्यातून पाठविल्या राख्या आणि भेटकार्ड:‘राखी हम बहनों की, रक्षा वीर जवानों की’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींकडून भेट